Uddhav Thackeray Vs Eknath Shinde Sarkarnama
विश्लेषण

Shivsena MLA Disqualification Result : शिवसेना Vs शिवसेना जिंकले कोण?

सरकारनामा ब्युरो

सचिन देशपांडे -

Shivsena 16 MLA Disqualification Verdict : शिवसेना फुटण्याचा आणि बंडाचा तसा जुना इतिहास आहे. पण, त्या त्या वेळी बंडोबांना थंड करण्यात जहाल शिवसेना आक्रमकपणे यशस्वी झाली. आता मात्र यावेळी बंडोबांनी थेट त्यावेळच्या जहाल शिवसेनेला चांगलेच थंड केल्याचे चित्र आहे. विद्यमान ठाकरे गटाच्या शिवसेनेची मवाळ भूमिका हे देखील त्यामागील एक कारण असू शकते.

शिवसेनेच्या थंडगार सल्लागारांचे हे मोठे अपयश असून त्यांच्या भूमिकेचा फटका शिवसेनेला बसल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर असताना हे बंड झाले. त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसेनाला भविष्यात किमान त्यांचे सल्लागार तरी बदलावे लागतील हे आज स्पष्ट झाले आहे.

शिवसेना(Shivsena ) विरोधात शिवसेना, आणि त्याच बरोबर शिवसेनेतील बंडाची व्यूहरचना हे सर्व करताना अतिशय हुशार पध्दतीने राजकीय खेळ्या खेळल्या गेल्या होत्या. त्या हुशार खेळीत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेला खिंडीत पकडत केवळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. राहुल नार्वेकर यांना अध्यक्ष म्हणून निर्णय द्यायचा होता, त्यामुळे त्यांचा निर्णय एकीकडे झुकलेला असे म्हणता येणार नाही.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर(Rahul Narvekar) न्यायदानाच्या पवित्र भूमिकेत आज होते. त्यामुळे त्यांच्यावर संशय व्यक्त करणे, हे त्या पदाची प्रतिमा न जपण्यासारखे असे होईल. लोकशाही परंपरेत त्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्याची गरज होती. कारण, उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेनेला सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी वाट मोकळी आहे. निकालावर टीका टिप्पणी करताना ज्यांच्या विरोधात निकाल लागला त्यांनी विधानसभा अध्यक्ष या पदाची प्रतिष्ठा जपण्याची गरज आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले(Nana Patole) यांनी विधानसभा अध्यक्ष पद सोडल्यापासून हा घटनाक्रम पाहण्याची गरज आहे. विधानसभा अध्यक्ष हे पद किती महत्वाचे आहे, याची जाणीव त्यावेळचे सत्ताधारी आणि आजच्या विरोधकांना झाली असेल. त्याचबरोबर उध्दव ठाकरे यांनी न लढता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणे, ही देखील सर्वात मोठी चूक होती. शिवसेना विरुध्द शिवसेना लढवित आपण स्वतः नामानिराळे राहणारी भाजपा आजच्या निकालाने सर्वाधिक आनंदी असेल.

पण, त्याचबरोबर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे देखील असेच हाल होतील काय, असा संशय या निमित्त विचारला जात आहे. राज्यात अजुन काँग्रेसमध्ये फुट पडली नाही. ती आता पडण्याची शक्यता देखील धुसर झाली आहे. एकमेकांच्या कुरघोडीच्या राजकीय वातावरणात महाराष्ट्रातील सभ्य राजकीय संस्कृती लयास जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आजच्या निकालाने उध्दव ठाकरे गटाच्या शिवसेना आमदारांचे कुठलेही नुकसान झाले नाही. आमदारकी कायम राहिली. त्यामुळे या आमदारांचा रोष तिथेच थांबविला गेला. भविष्यात त्यांचा राजकीय फायदा कोण घेणार हे येणारा काळच ठरवेल. ठाकरे गटाच्या 14 आमदारांना एकप्रकारे जीवनदान मिळाल्याचे चित्र आहे.

हा सुवर्णमध्य कसा काय साधला गेला, असा प्रश्न अनुत्तरीत आहे. त्याच बरोबर पक्षविरोधी कारवाया करणे, व्हिप न पाळणे, पक्ष शिस्त न पाळणे या मुद्यांवर शिंदे गटाच्या 16 आमदारांची आमदारकी न जाता ती कायम राहिली हा देखील सुवर्णयोग आज जुळवून आला.

शिवसेना विरुध्द शिवसेना असो की, राष्ट्रवादी विरोधात राष्ट्रवादी असा वाद असो या दोन्ही पक्षातील राजकीय कुरघोडी या आता जनतेच्या दृष्टीने जास्त महत्वाचे राहिल्या नाहीत. सामान्य जनता आता निवडणूकीची वाट पाहत आहेत. पुढील निवडणुकीत राजकीय वादाचा शेवट मात्र सामान्य जनताच करेल हे नक्की. शेवटी लोकशाहीत मतदारच राजा आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT