Meeting of India Alliance Sarkarnama
विश्लेषण

INDIA Aghadi : इंडिया आघाडीत ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ; लोकसभेच्या 170 महत्वाच्या जागांचा मुद्दा...

सरकारनामा ब्यूरो

- सचिन देशपांडे

INDIA Aghadi : इंडिया आघाडीच्या समन्वय बैठकीत तीन मोठ्या पक्षांनी हवा काढल्याचे चित्र होते. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तरप्रदेशातील या तीन राज्यातील पक्षांनी इंडिया आघाडीच्या समन्वयाच्या मिटिंगला दांडी मारल्याने लोकसभा निवडणुकीचे गणित बिघडविल्याची चर्चा रंगली आहे. लोकसभेच्या जवळपास 170 जागा या तीन राज्यात आहे. या महत्वाच्या जागांचा मुद्दा आता उपस्थित झाला आहे.

लोकसभा निवडणुक तोंडावर असताना या तीन राज्यातील पक्षांनी दाखविलेला ताठरपणा हा इंडिया आघाडीला अडचणीचा ठरु शकतो. दूसरीकडे तो भाजपासाठी फायदेशीर ठरेल. त्या - त्या राज्यातील जास्तीत जास्त जागांची मागणी स्थानिक पक्षांनी केल्याने काँग्रेस समोर मोठा प्राब्लेम निर्माण झाला आहे. त्यात पुढील काही दिवसात काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सुरु होत असताना या तीन राज्यातील पक्षांना जोडण्यात काँग्रेस कुठे कमी पडली, असा प्रश्न उपस्थित होतो.

नितीश कुमार यांनी आज इंडिया आघाडीचे समन्वयक पद नाकारत काँग्रेसवर अप्रत्यक्ष दबाव वाढविल्याचे चित्र आहे. दिल्लीतील बैठकीत या विषयावर निर्णय घेण्याची गरज असताना काँग्रेसने ते टाळले आणि आज ऑनलाईन झालेल्या बैठकीत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना समन्वयक पद देण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला पण, त्यांनी तो नाकारत काँग्रेसला अडचणीत तर आणले.

त्याचबरोबर मोठा पेच काँग्रेस समोर निर्माण केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे इंडिया आघाडीचे अध्यक्ष आज घोषित झाले पण, या नियुक्ती निमित्त उत्साह काँग्रेस मध्ये दिसून आला नाही. संयुक्त जनता दलाचे नेते व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीचे समन्वयक पद नाकारल्याने हा उत्साह मावळल्याची माहिती समोर येत आहे.

देशात सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशातून आज समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव हे इंडिया आघाडीच्या बैठकीत उपस्थित नव्हते. त्यामुळे उत्तरप्रदेशाच्या 80 जागांवर होणारी चर्चा या बैठकीत झाली नसल्याची माहिती मिळत आहे. उत्तर प्रदेश या महत्वाच्या राज्यात मतविभाजन झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका हा काँग्रेसला होण्याची दाट शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समाजवादी पार्टीची मोठी व्होटबँक उत्तरप्रदेशात आहे. त्यामुळे आज इंडिया आघाडीच्या बैठकीत अखिलेश यादव यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. केवळ उत्तर प्रदेशातील जागांचा समाजवादी पार्टीसमोर विषय नसून 'सपा'ला मध्यप्रदेशात देखील काही जागा पाहिजे. त्यास काँग्रेसची नकारघंटा या वादात भरच घालताना दिसत आहे. समाजवादी पार्टीचे इंडिया आघाडीतील स्थान बळकट करण्यासाठी काँग्रेसला पुढाकार घ्यावा लागेल.

तरच इंडिया आघाडीच्या पुढच्या बैठकींना काही अर्थ असेल. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील स्थानिक पक्षांनी इंडिया आघाडीच्या या बैठकीकडे पाठ दाखवित त्यांचे इरादे आज स्पष्ट केले आहे. इतक्यावर हे दोन्ही पक्षांचे नेते थांबले नाहीत तर त्यांनी सीट शेअरींगचा काँग्रेसचा फाॅर्म्युला देखील फेटाळल्याची माहिती आहे. शिवसेना (उबाठा) यांना महाराष्ट्रात 23 जागा पाहिजे.

तर पश्चिम बंगाल मध्ये तृणमुल काँग्रेसने 39 जागावर दावा केला आहे. इंडिया आघाडीच्या आजच्या बैठकीकडे तृणमुल काँग्रेस अध्यक्षा व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्याच बरोबर शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांची अनुपस्थिती चर्चेत होती. लोकसभेच्या उत्तर प्रदेशात 80, महाराष्ट्रात 48 आणि पश्चिम बंगाल मध्ये 42 जागा असून 170 लोकसभा जागांचा हा मुद्दा आहे.

या ठिकाणी लोकसभा निवडणूकीचे गणित बिघडले तर देशातील निवडणुकीचे चित्र एकतर्फी होण्याची दाट शक्यता आहे. सपा, शिवसेना आणि तृणमुल काँग्रेस यांच्या सोबत आघाडी करण्यात काँग्रेस ने नमते घतले नाही तर इंडिया आघाडीचे अस्तित्वच धुसर आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT