उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिलेला सल्ला चर्चेचा विषय: सामनाच्या महामुलाखतीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीस यांना सहकारी मंत्र्यांच्या वादांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला.
राजकीय संबंध सुधारण्याचा संकेत: ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील वैयक्तिक भेटी वाढल्या असून, दोघांमध्ये पूर्वीपेक्षा संवाद वाढल्याचे दिसते.
महायुतीत प्रवेशाची शक्यता आणि चर्चेची शक्यता: फडणवीसांनी महायुतीमध्ये येण्याची खुली ऑफर दिली असली, तरी त्यावर ठाकरे गोंधळलेले नाहीत, मात्र दोघांच्या प्रतिक्रियांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai News : मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले ठाकरे बंधू येत्या काळात राजकीय दृष्ट्या एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवत टीका केली आहे. सामनाच्या महामुलाखतीतून त्यांनी सत्ताधारी महायुतीच्या मंडळींवर जोरदार हल्लाबोल केला. या मुलाखतीवेळी त्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यासोबाबतच त्यांनी या मुलाखतीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक राजकीय सल्ला दिला आहे. ठाकरेंनी दिलेला हा सल्ला फडणवीस पचवू शकतील का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
राजकारणात सल्ले क्वचितच मान्य करण्यासारखे असतात. त्या सल्ल्यामागे काही तरी राजकीय अर्थ दडलेला असतो. त्यामागे अनेकदा सूचकतेचा, टोमण्याचा आणि संकेतांचा खेळ लपलेला असतो. उद्धव ठाकरेंनी नुकताच फडणवीसांना दिलेला हा सल्ला, जो राज्याच्या सध्याच्या राजकीय वातावरणावर भाष्य करणारा आहे. गेल्या काही महिन्यांत भाजपची (BJP) रणनीती, शिंदे गटाची साथ आणि आगामी निवडणुकांचे समीकरण या सगळ्यावर उद्धव ठाकरे अधूनमधून भाष्य करत आहेत. त्यामुळे हा सल्ला महत्वाचा मानला जात आहे.
राज्यात भाजप व शिवसेनेची 25 वर्षापेक्षा अधिक काळ युती होती. त्यामुळे उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांचे संबंध मैत्रीपूर्ण राहिले आहेत. 2014 साली राज्यातील शिवसेना-भाजपची युती तुटली. त्यामुळे काही काळ फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यानंतर 2019 च्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे महाविकास आघाडीसोबत गेल्यानंतर दोघांतील संबंध पूर्वीसारखे राहिले नव्हते. त्यानंतर जून 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 40 आमदार व 13 खासदार गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील सरकार पडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे व फडणवीस यांच्यातील संबंध ताणले गेले होते.
2024 च्या निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यामुळे ठाकरे यांनी दोघातील बिघडलेले संबंध बाजूला ठेऊन सभागृहात कामाच्या निमित्ताने फडणवीस यांची भेट घेतली. गेल्या आठ महिन्यात त्यांची चार-पाच वेळा भेट झाली आहे. चार दिवसापुर्वीच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निवृत्तीनिमित्ताने सभागृहात बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना महायुतीसोबत येण्याची खुली ऑफर दिली होती. सत्ताधारी पक्षात येण्यासाठी स्कोप असल्याचे सांगत त्यांनी ऑफर दिली. मात्र, फडणवीस यांनी त्यानंतर गंमत केल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे हा गंमतीचा भाग सोडला तर दोघातील संबंध चांगले राहिले आहेत.
त्यातच उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या महामुलाखतीमध्ये सीएम फडणवीस यांना एक राजकीय सल्ला दिला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला हा सल्ला फडणवीस यांच्या पचनी पडणार का? याविषयाची उत्सुकता शिगेला पोहचली असून सर्वांचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे.
राज्यातील प्रश्नांसंदर्भात कधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा होते का? असा सवाल संजय राऊत यांनी मुलाखतीप्रसंगी उद्धव ठाकरेंना विचारला होता. सुरुवातीला एकदा जाऊन मी त्यांना पुष्पगुच्छ दिला होता. विधिमंडळात भेटीगाठी व्हायला हरकत नसावी. त्याचेही फार मोठं राजकारण झाले. गेलो होतो भेटायला...शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. मानो या ना मानो...त्यांच्याकडून राज्याचे चांगले व्हावे, हीच अपेक्षा आजसुद्धा असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्याशिवाय माझे तर म्हणने आहे की, आता ज्या काही त्यांच्या सहकारी मंत्र्यांची भांडणे, लफडी बाहेर येताहेत ती त्यांनी मोडीत काढली पाहिजेत. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगत आहे अन् हा टोमणा वगैरे नाही, हा त्यांना सल्ला आहे, हे आधीच स्पष्ट करतो, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.
त्यामुळे येत्या याकाळात सीएम फडणवीस हे त्यांचे एकेकाळचे जुने मित्र म्हणत उद्धव ठाकरेंनी दिलेला लाखमोलाचा सल्ला मान्य करणार का? याची उत्सुकता लागून राहिली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या या राजकीय सल्ल्याला फडणवीस देखील सडेतोड उत्तर देणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
फडणवीस हे राजकीय दृष्टिकोनाने संयमी आणि ठाम भूमिका घेणारे नेते मानले जातात. परंतु अलीकडील घडामोडी आणि पक्षांतर्गत दबाव लक्षात घेतल्यास, त्यांच्यावर वाढता दबाव जाणवतो. अशा वेळी ठाकरे यांचा हा ‘सल्ला’ म्हणजे राजकीय मनोबल तोडण्याचा प्रयत्नही असू शकतो. त्यामुळे हा सल्ला त्यांच्या पचनी पडणार का? याची उत्सुकता लागली आहे.
उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना जरी राजकीय सल्ला दिला असला तरी, ते ऐकणार का?, कसा पचवतो आणि त्यावर कोणती कृती होते, यातूनच आगामी समीकरण ठरणार आहे. उद्धव ठाकरे सध्या शब्दांचे बाण सोडत आहेत, पण फडणवीस त्या बाणांना कशा प्रकारे झेलणार की त्याला धारदारपणे उत्तर देणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना काय सल्ला दिला?
→ त्यांनी सहकारी मंत्र्यांच्या वादांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला.
उद्धव आणि फडणवीस यांच्यातील संबंध कसे आहेत?
→ संबंध ताणलेले असले तरी अलीकडे संवाद वाढल्याचे दिसते.
फडणवीसांनी महायुतीत सामील होण्यासाठी ऑफर दिली का?
→ होय, त्यांनी उद्धव ठाकरेंना महायुतीत येण्यासाठी खुली ऑफर दिली होती.
ठाकरे फडणवीसांचा सल्ला मानतील का?
→ याबाबत निश्चितता नाही, पण संपूर्ण राज्याचे लक्ष याच निर्णयाकडे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.