BJP Politics : ठाणे लोकसभा असो अथवा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक असो या निवडणुकीत भाजपने महायुती म्हणून एक पाऊल मागे घेत, मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला जागा सोडल्या. अशातच दुसरीकडे होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाणे आणि पालघरसाठी भाजपची आक्रमक आणि आग्रही भूमिका घेत असल्याचे चित्र दिसत आहे.
त्यानुसार या दोन्ही मतदारसंघाच्या जागेवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दावा ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. ठाणे आणि पालघरमध्ये सर्वाधिक मतांचे आकडा असल्याने या जागा भाजपला मिळावे असा सूर आवळला जात आहे.
शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना असे ब्रीद वाक्य शिवसेनेचे आहे. अशातच मागील काही वर्षात ठाणे जिल्ह्यातील बदलेली राजकीय परिस्थितीमुळे जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यात १८ मतदारसंघ असून त्यापैकी ९ आमदार भाजपचे आहेत. तर, शिंदेच्या शिवसेनेचे सहा आमदार आहेत. असे असताना, देखील यापूर्वी ठाणे लोकसभा आणि शिक्षक मतदारसंघावर भाजपने दावा केला होता. मात्र, महायुतीच्या जागा वाटपात या दोन्ही जागा शिंदे सेनेला सोडण्यात आल्या.
त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. या जागेवर पूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार रविंद्र फाटक हे यापूर्वी निवडून आले होते. महापालिका निवडणुका झाल्या नसल्यामुळे गेली चार वर्षे ही निवडणुक झालीच नव्हती. ही निवडणूक जाहीर होताच, या जागेवर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दावा ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीत नव्या राजकीय संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत.
ठाणे लोकसभा तसेच शिक्षक मतदारसंघात भाजपची ताकद असल्याने भाजप उमेदवाराने निवडणुक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, महायुतीत हे दोन्ही मतदारसंघ शिंदेच्या शिवसेनेला सोडण्यात आले. आता ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातही भाजपचे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे ही जागा भाजपला मिळावी, असा आमचा आग्रह आहे, भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितले.
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अंदाजे १०३० मतदार असून या मतदारसंघात ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, वसई-विरारसह सात महापालिका, सात नगरपालिका आणि सहा नगरपंचायतींचा समावेश आहे. अशातच ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपकडे सर्वाधिक ४४४ मतांचे संख्याबळ आहे तर, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि निलेश सांबरे गटाकडे मिळून केवळ ३४६ मते आहेत.
हे दोन्ही पक्ष महायुती म्हणून निवडणुक लढले तर, महायुतीच्या उमेदवारासाठी ही निवडणुक सहज सोपी असल्याचे दिसून येत आहे. दोन्ही पक्षांनी मात्र स्वतंत्र निवडणुक लढविली तर, निवडणुक अटीतटीची होण्याची चिन्हे आहेत.
पक्ष मतांचे संख्याबळ
भाजप - ४४४
शिवसेना(शिंदे) -३२६
निलेश सांबरे -२०
बहुजन विकास आघाडी -७१
काँग्रेस -४७
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) - ३८
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)- २९
शिवसेना (उद्धव ठाकरे) -१८
मनसे - ०६
समाजवादी पार्टी -०६
मार्क्सवादी कम्युनिस्ट -०६
एमआयएम -०५
कोनार्क विकास आघाडी- ०४
भिवंडी विकास आघाडी -०३
वंचित बहुजन आघाडी -०२
साई पक्ष -०१
अपक्ष -०९