Mahayuti Leader Sarkarnama
विश्लेषण

Eknath Shinde Group : शिंंदेंच्या मंत्र्यांना झालंय तरी काय? एक म्हणतात ‘विद्यार्थी फोडा’; दुसरे म्हणतात, ‘पोरांनो, शाळेत भाजीपाला विकायला आणा’

Maharashtra Cabinet Minister Statement : गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरत चालल्याचे दिसून येत आहे. सरकारमधील मंत्रीच विभाजनवादाची भूमिका मांडतात, हे महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. मात्र, दुर्दैवाने सध्या ते चित्र दिसून येत आहे.

Vijaykumar Dudhale

Maharashtra Political News : महाराष्ट्र हे देशाला दिशा देणारे राज्य मानले जाते. या मातीतील राज्यकर्त्यांनी देशाला नानाविविध योजना दिल्या आहेत. रोजगार हमी योजना, महिला आरक्षण हे पाऊल महाराष्ट्राने पहिल्यांदा उचलले आणि ते देशाने स्वीकारले. मात्र, गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणाचा दर्जा घसरत चालल्याचे दिसून येत आहे. सरकारमधील मंत्रीच विभाजनवादाची भूमिका मांडतात, हे महाराष्ट्राने कधी पाहिले नव्हते. मात्र, दुर्दैवाने सध्या ते चित्र दिसून येत आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात वाचाळवीरांची काही कमी नाही. अनेक मंत्री वादग्रस्त करण्यात धन्यता मानत आहेत. त्यातही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांचे मंत्री वायफळ बडबड करण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे, भाजपच्या मंत्र्यांचाही त्यात समावेश आहे, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या वाचाळवीरांना आवरण्याची गरज आहे.

राज्याचे कृषिमंत्री म्हणून माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना राजकीय आयुष्यात प्रथमच थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे. मात्र, मंत्री झाल्यापासून कोकटे यांची गाडी सुसाट सुटली आहे. सुरुवातीलच त्यांनी नाराज असलेल्या स्वपक्षातील माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे भुजबळांची नाराजी कमी होण्याऐवजी वाढतच गेली.

कृषिमंत्री म्हणून मंत्रिपदावर असतानाही कोकाटे यांनी असेच बेताल विधान केले होते. ‘शेतकरी कर्ज घेतात आणि पाच-दहा वर्षे कर्जमाफीची वाट बघतात. कर्जमाफीतून मिळणारे पैसे लग्न, साखरपुड्यावर उडवतात, अस विधान कोकाटे यांनी नुकतेच केले होते. याच कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी केली होती, त्यामुळे कोकाटे हे वादग्रस्त विधाने करण्यात आघाडीवर असतात.

कोकाटे यांनी कर्जमाफीच्या अनुषंगाने केलेल्या विधानावर भारतीय जनता पक्षाचे (BJP) प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माफी मागितली हेाती. त्यानंतर काही दिवसांनी कोकाटे यांनीही दिलगिरी व्यक्त केली हेाती. मात्र, त्यामुळे सरकारचे जे काही व्हायचे ते नुकसान झाले. पण, वाचाळीवर काही थांबायला तयार नाहीत

भारतीय जनता पक्षाचे नीतेश राणे हे तर कायमच वाद्‌ग्रस्त विधाने करत असतात. दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकणारी अनेक विधाने मंत्री राणे यांनी केली आहेत. मात्र, भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरधील दंगलीनंतर फडणवीसांनी त्यांना तंबी दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सध्या ते जरा शांत आहेत. मात्र, ठाकरेंवर बोलताना ते कायम पातळी सोडून बोलत असतात.

वाचाळवीरांमध्ये शिंदेंचेही मंत्री काही कमी नाहीत. राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मतदारांघातील रस्त्यावरून वादग्रस्त विधान केले होते. गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली होती. खडसे हे मुक्ताईनगर भागात ३० वर्षांपासून आमदार आहेत. मात्र, त्यांना आपल्या मतदारसंघातील रस्ते चांगले करता आलेले नाहीत. माझ्या धरणगाव मतदारसंघात हेमा मालिनीच्या गालासारखे सुंदर रस्ते मी केले आहेत, असे विधान पाटील यांनी केले होते.

त्याच गुलाबराव पाटील यांनी शनिवारी जळगाव जिल्ह्यातील एका शैक्षिणक कार्यक्रमात बोलताना ‘आम्ही जसं पक्षाचे लोक फोडतो, तसं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजेत,’ असा वाद्‌ग्रस्त सल्ला शिक्षकांना दिला होता. आपल्याकडून चुकीचे विधान गेल्याचे लक्षात येताच पाटील यांनी नेहमीप्रमाणे यू टर्न घेत मी ते विनोदाने बोललो. शाळेतील पटसंख्या कशी वाढेल, ते विनोदाने सांगण्याचा तो प्रयत्न होता, असे स्पष्टीकरण गुलाबरावांनी दिले आहे.

शिंदे यांचे आणखी एक सहकारी राज्याचे शिक्षणमंत्री यांनीही विद्यार्थ्यांना अजबच सल्ला दिला आहे. शिक्षण मंत्री झालेल्या दादा भुसेंनी शाळांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे. नंदुरबार येथे त्यांनी शैक्षणिक कामांचा आढावा घेतला. त्यानंतर बोलताना ‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पिकणारा भाजीपाला शाळेत विक्रीसाठी आणावा,’ असा अजब सल्ला दिला.

विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन ज्ञानार्जन करावे की भाजपाला विकत बसावे, याचा विचार शिक्षणमंत्र्यांनी करायला हवा. मंत्रिपदावर राहून जनतेच्या जीवनात बदल घडविण्याऐवजी आपण नेमकं काय सांगतोय, याचा विचार मंत्रीमहोद्‌यांनी केला पाहिजे. एकीकडे एआय सारखे आधुनिक तंंत्रज्ञान आलेले असताना आपण भाजीपाला विकण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देतोय. रयत शिक्षण संस्थेने अभ्यासक्रमात एआय तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या तुलनेत आज शिक्षणमंत्री कुठे आहेत आणि ते काय विचार करतात, याचे दुःख वाटते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT