
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली आहेत. सिंधू पाणीवाटप करार रद्द करण्याबरोबच पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसाची वैधता समाप्त करण्यात आली आहे. या नागरिकांना 27 एप्रिलपूर्वी देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातून हिंदू पाकिस्तानी नागरिकांना वगळण्यात आले आहे. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी देशभरातील मुख्यमंत्र्यांना सतर्क केले आहे.
अमित शाह यांनी देशातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये पाकिस्तानी नागरिक आहेत. त्या प्रत्येकाचा शोध घेऊन त्यांना पाकिस्तानात परत पाठविण्यात यावे, अशा सूचना शहांनी सर्व मुख्यमंत्र्यांना दिल्या आहेत. एकही पाकिस्तानी नागरिक भारतात राहू नये, असे शहांनी राज्यांना सतर्क केले आहे.
भारताकडून पाकिस्तानविरोधात कडक पावले उचलली जात आहेत. त्याचाच भाग म्हणून पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यांना देश सोडण्यासाठी 27 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच विशेष व्हिसाअंतर्गत भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांनाही 48 तासांत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापार्श्वभूमीवर शहांनी मुख्यमंत्र्यांना अलर्ट केले आहे.
भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्ताननेही भारतीय नागरिकांचा व्हिसा रद्द करून त्यांना तातडीने देश सोडण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे सिमला करार रद्द केला असून वाघा बॉर्डरही बंद केली आहे. भारतासोबतचा व्यापार बंद करण्याचा निर्णय़ही पाकिस्तानने घेतला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढत चालला आहे. त्याचे पडसाद दोन्ही देशांमध्ये उमटत आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी पहलगाम हल्ल्यावर पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी दहशतवाद्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल, अशी शिक्षा दिली जाईल, असा इशारा दिला आहे. हा दहशतवादी हल्ला पर्यटकांवरील नसून देशाच्या आत्म्यावरील हल्ला असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे यानंतरही भारताकडून पाकिस्तानला अद्दल घडविण्यासाठी मोठी पावले उचलली जाऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.