
Bihar political connection : विधानसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारीत असलेल्या बिहारमधील सत्ताधारी एनडीएच्या हाती ‘बिडी’ लागली आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने हे आयतं कोलित भाजपच्या हाती दिलं आहे. त्याचं झालं असं की, बिडीवरील जीएसटी कमी करण्यात आल्यानंतर केरळ काँग्रेसने बी पासून ‘बिहार आणि बी पासून बिडी’ अशी पोस्ट सोशल मीडियात केली आणि एनडीए नेत्यांना निमित्त मिळालं. आता याच बिडीने बिहारचं राजकारण पेटलं आहे. काँग्रेसनं बिहारचा अपमान केल्याचा आरोप एनडीएकडून केला जात आहे.
बिहारच्या राजकारणात आग लावलेली ही बिडी भारतात नेमकी आली कुठून आणि कधी, त्याचे बिहारशी काय कनेक्शन आहे, याची कहाणी रंजक आहे. भारतात साधारणपणे 1600 च्या दशकात पोर्तूगीजांनी बिडीला भारतात आणल्याचे सांगितले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारितील केंद्रीय तंबाखू संशोधन संस्थेचा याबाबतचा एक अहवालही आहे.
अहवालानुसार, भारतात 1787 मध्ये कोलकाता बॉटनिकल गार्डनची स्थापना झाल्यानंतर बिडीमध्ये सुधारणा होण्यास सुरूवात झाली. व्हर्जिनिया तंबाखूची शेती आणि त्यावर विविध प्रयोग उत्तर प्रदेशात सुरू झाली. तर काळ्या मातीमध्ये व्यावसायिक शेतीची सुरूवात 1920 मध्ये झाली होती. 1930 पर्यंत भारताने तंबाखूच्या शेतीत जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण केली होती.
भारतात ब्रिटीश काळातच तंबाखूचा उद्योग भरभराटीला येऊ लागला होता. महात्मा गांधी यांच्या स्वदेशी आंदोलनानेही बिडी उद्योगाला हातभार दिला. विदेशी सिगारेटची चटक लागलेला शिक्षित वर्गही त्यावेळी बिडीकडे वळल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बिडी उद्योगाचा व्याप वाढला आणि त्याकडे लघु उद्योग म्हणून पाहिले जाऊ लागले होते.
मध्य भारतात रेल्वेचे आगमन झाल्यानंतर तंबाखू आणि बिडीचा पुरवठा करणे अधिक सोपे झाले. बिडीचे ब्रॅंड तयार झाले. त्यामुळे हुक्क्याचे प्रमाण कमी झाले. ग्रामीण भागासह शहरी भागातही हा उद्योग पसरला. भारतात बिडीचे उत्पादन प्रामुख्याने बिहारसह मध्य प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांमध्ये होते. त्यामुळे बिहारमध्ये बिडीवरून राजकारण तापले आहे.
भारतात तब्बल 45.7 मिलियन लोकांना बिडी उद्योगातून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे. त्यामध्ये तेंदूपत्ता गोळा करण्यापासून ते बिडी विक्रीपर्यंतचा समावेश आहे. भारत हा जगात तंबाखू आणि बिडीचे उत्पादन करणारा दुसरा सर्वात मोठा देश असून निर्यातीच्या बाबतीत भारताचा क्रमांक तिसरा आहे. त्याचप्रमाणे तंबाखू आणि बिडीचे सर्वाधिक ग्राहकही भारतातच आहे. सरकारसाठी ही नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. विविध कर आणि नियम लावूनही त्याची भारतातील विक्री कमी झालेली नाही. हीच बिडी सध्या बिहारमधील राजकारणाच्या केंद्रस्थानी आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.