
New Delhi News : दिल्लीत भाजपने ऐतिहासिक विजय मिळवून सत्ता काबीज केली आहे. अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला नसला तरी कामाचा धडका सुरू झाला आहे. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जे जमलं नाही, ते काम भाजपची सत्ता येताच सुरूही झालं आहे. निवडणुकीच्या काळात गाजलेला हा मुद्दाच आता आम आदमी पक्षासाठी अडचणीचा ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीच्या अस्वच्छतेचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला होता. भाजपने नदीत विष कालवल्याचा गंभीर आरोप केजरीवालांनी प्रचारादरम्यान केला होता. त्यावरून रान उठलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यावरून आपवर निशाणा साधला होता. भाजपसह आपनेही आपल्या जाहीरनाम्यात नदी स्वच्छतेचे आश्वासन दिले होते.
केजरीवालांनी पाच वर्षांपूर्वीही नदी स्वच्छतेचे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या सरकारला हे काम करता आले नाही. आता राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर यमुना नदी स्वच्छेता प्लॅन सक्रीय झाला आहे. रविवारपासून या कामालाही सुरूवात झाली आहे. प्रदुषित नदी स्वच्छ करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी हा प्लॅन तयार करण्यात आला होता.
भाजपची सत्ता आली असली तरी आठ दिवस उलटूनही राज्याला मुख्यमंत्री मिळालेले नाहीत. त्यामुळे सध्यातरी नायब राज्यपाल धोरणात्मक निर्णय घेत आहेत. आपची सत्ता जाताच त्यांनी पुढाकार घेत नदीच्या स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी शनिवारी मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांची याअनुषंगाने बैठक घेतली होती.
नदीतील कचरा बाहेर काढण्याबरोबरच दुषित पाणी नदीत जाऊ नये, यासाठी काम सुरू झाले आहे. नदी स्वच्छतेच्या कामात पुढेही सातत्य ठेवले जाणार आहे. सांडपाणी व्यवस्थापनावर प्राधान्याने लक्ष दिले जाणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारले जाणार असून त्यासाठी कालावधीही निश्चित करण्यात आला आहे. कंपन्यांमधून रसायनयुक्त पाणी नदीत येऊ नये, यासाठी नायब राज्यपालांनी प्रदुषण नियंत्रण मंडळालाही सक्त ताकीद दिली आहे.
आपला सत्तेतून बाहेर काढत भाजपने 27 वर्षांनंतर पुन्हा सत्ता मिळवली आहे. आता पुन्हा आपला राज्यात सत्ता मिळू नये, यासाठी भाजपकडून दिल्लीकरांच्या प्रमुख समस्यांवर लक्ष केंद्रीत केले जाऊ शकते. त्यामुळे यमुना नदी स्वच्छतेचा मुद्दाही अजेंड्यावर असेल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती, झोपडपट्टी सुधारणा आदी मुद्देही आहेत. भाजपकडून आतापासून 2030 च्या निवडणुकीची तयारी सुरू केली जाणार असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.