
New Delhi News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर आता गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकांसाठी महायुतीसह महाविकास आघाडीच्या राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. आता अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत (Local Body Election) एक मोठी अपडेट समोर आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसदर्भात मंगळवारी(ता.28) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महत्त्वाची सुनावणी पार पडली. यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता होती. पण आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.आता सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी येत्या 25 फेब्रुवारी सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण आदेश दिला जाण्याची शक्यता होती. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात अंतिम सुनावणी होऊन त्यांचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यांतीलही महानगरपालिका,जिल्हा परिषदा, पंचायत समित्या,नगरपरिषदा आदींच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती.
राज्यातील मुंबई,पुणे,पिंपरी चिंचवड यांसह 29 महानगरपालिका,257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका गेल्या साडेतीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे आपला मोर्चा वळवला आहे.बैठका, मेळावे,दौरे,भेटीगाठी यांच्यासह राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीनं वेग पकडला आहे.
सर्वाच्च न्यायालयात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व ओबीसी आरक्षण यांच्यातील याचिकेवर अंतिम सुनावणी होऊन मोठा निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र,पुन्हा एका तारीख पे तारीख पाहायला मिळाली आहे.यावेळी राज्य सरकारच्यावतीने तुषार मेहता यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासंदर्भात भाष्य केले होते. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर व्हाव्यात, अशी आम्हालाही अपेक्षा आहे. सदृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे अत्यंत चुकीचं आहे, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.