
Congress News : ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर काँग्रेसमध्ये नाराज असल्याचे बोलले जाते. संसदेत महत्त्वाच्या विषयांवर बोलू दिले जात नाही. पक्षातही दुर्लक्ष केले जाते. मग काँग्रेस पक्षात माझी नेमकी काय भूमिका आहे? असा प्रश्न विचारणारे पत्रच त्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना लिहिले आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये केरळ विधानसभेची निवडणूक होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर थरूर यांनी लिहिलेले हे पत्र काँग्रेससाठी धक्कादायक मानले जात आहे.
शशी थरूर (Shashi Tharoor) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून माजी केंद्रीय मंत्रीही आहेत. इंग्लीश भाषेचे विद्वान म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांची संसदेतील भाषणेही अभ्यासपूर्ण आणि श्रवनीय असतात. सोनिया गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेली अध्यक्षीय निवडणूक थरूर यांनी लढवली होती. यात मल्लिकार्जून खर्गे यांनी थरूर यांचा पराभव केला होता. मात्र गत काही दिवसांपासून ते पक्षात नाराज असल्याचे दिसून येत आहे.
संसदेत आपल्याला बोलू दिले तर जात नाहीच, पण पक्षातही दुर्लक्ष केले जात आहे. काँग्रेसमध्ये स्वत:ची ओळख निर्माण करण्यास आणि नेतृत्वाची भूमिका निभावण्यास पुरेशी संधी दिली जात नाही. केरळच्या राजकारणाकडे लक्ष द्यायला हवे का? असे विचारले असता याबाबतही पक्ष स्पष्टपणे काही सांगावयास तयार नाही. कॉंग्रेसच्या युवा विभागाची जबाबदारी सांभाळण्यास आपण तयार आहोत, मात्र या प्रस्तावावर पक्षाने सकारात्मक उत्तर दिलेले नाही, अशी तक्रार करणारे पत्रच थरूर यांनी राहुल गांधी यांना लिहिले आहे.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी थरूर यांनी मोदींबद्दल सकारात्मक भाष्य केले होते. आपल्या पंतप्रधानांना एआय अॅक्शन समिटमध्ये सह-अध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका मिळाली असेल तर ती आपल्या देशासाठी खूप चांगली गोष्ट आहे. यासोबतच, ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर लगेचच पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीला त्यांनी खूप महत्त्व दिले होते.
मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीचे काही संभाव्य परिणाम देशवासीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. यातून सकारात्मक बाबी निघणार आहेत. एक भारतीय नागरिक म्हणून आपण या भेटींचे स्वागत करतो, असे थरूर यांनी सांगितले होते. अलिकडेच थरूर यांनी केरळ सरकारच्या औद्योगिक धोरणाचे आणि स्टार्ट-अप धोरणांचे कौतुक करणारा लेख लिहिला होता. यामुळे संतप्त होऊन केरळमधील काही काँग्रेस नेत्यांनी हायकमांडकडे त्यांची तक्रार केली होती. केरळ काँग्रेसच्या मुखपत्र 'वीक्षणम डेली'नेही थरूर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती.
केरळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन म्हणाले की, थरूर यांनी कोणत्या डेटाच्या आधारे हा लेख लिहिला आहे हे पक्षाला माहित नव्हते. ज्या डेटाच्या आधारे त्यांनी हा लेख लिहिला आहे त्याची चौकशी पक्ष करू शकतो. दरम्यान, थरूर यांच्या याच भूमिकांमुळे काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. यातूनच राहुल गांधी यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.