
Nishikant Dubey: मराठी-हिंदीचा वाद महाराष्ट्रात सुरु असताना भाजपचे झारखंडमधील खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. त्या दुबेंना गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या महिला खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर आणि शोभा बच्छाव यांनी मराठी लोकांचा अपमान केल्याबद्दल जाब विचारला होता. या तिन्ही खासदारांनी दुबेंना संसदेच्या लॉबीमध्ये जय महाराष्ट्र म्हणायला भाग पाडलं होतं. या तीन रणरागिणींचा महाराष्ट्रात मोठी चर्चा झाली, मनसेकडून तर त्यांचं जाहीर कौतुक करण्यात आलं होतं. पण या बातमीबाबत आज दुबे यांनी लोकसभेत भाष्य केलं आणि वर्षा गायकवाड यांचा उल्लेख केला.
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरु असताना दुबे हे काश्मीरमधील ३७० कलमाचा संदर्भ देत होते. यावेळी विरोधकांमधून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरु होती. त्यामुळं दुबे हे बोलताना मध्येच थांबले आणि त्यांनी वर्षा गायकवाड यांचं नाव घेऊन गेल्या आठवड्यात लॉबीत घडलेल्या घटनेबाबत भाष्य केलं. त्यांनी म्हटलं की, "या ज्या वर्षा गायकवाड आहेत, यांना इतकंही माहिती नाही की लॉबीमध्ये जे चालतं ते हसत-मस्करीत सुरु असतं. पण त्यांनी याची बातमी बनवली, इतकंही त्यांना माहिती नाही"
दुबे यांच्या या विधानानंतर वर्षा गायकवाड या सभागृहातच आक्रमक झाल्या आणि त्यांनी दुबे यांना पुन्हा एकदा घेरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. दुबेंनी महाराष्ट्राचा अपमान केला होता, त्यामुळं आम्ही त्यांना जाब विचारला असं वर्षा गायकवाड बोलत होत्या. पण त्यानंतर त्या शांत झाल्या आणि दुबे यांनी मध्येच थांबवलेलं आपलं भाषण पुन्हा एकदा सुरु केलं. त्यानंतर पंडीत नेहरुंमुळं देशाचं कसं नुकसान झालं हे सांगताना दुबेंनी विविध उदाहरणं दिली.
दरम्यान, वर्षा गायकवाड आणि दोन महिला खासदारांनी महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या दुबेंना हिसका दाखवल्यानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील काँग्रेसच्या या तिन्ही महिला खासदारांचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. काल त्यांनी वर्षा गायकवाड यांना उद्देशून एक पत्र लिहून त्यांचं कौतुक केलं आहे. या पत्रात राज ठाकरे म्हणतात, "मराठी माणसानां आपटून आपटून मारू, अशी दर्पोक्ती करणाऱ्या निशिकांत दुबेला तुम्ही संसदेत घेराव घातला आणि जाब विचारलात याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा, मराठी भाषेचा अपमान, अन्याय होत असताना संसदेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारे खासदार गप्प असतात, असं चित्र मराठी जनांच्या समोर येत होतं. त्याला तुम्ही कृतीने छेद दिलात, याबद्दल तुमचं खरंच मनापासून आभार, असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात वर्षा गायकवाड यांना उद्देशून म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील इतर 45 खासदार गप्प का बसले माहीती नाही. पण तुम्ही हिंमत दाखवलीत याबद्दल तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. महाराष्ट्रासाठी तुमचा संसदेतील आवाज असाच बुलंद राहील अशी आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. तसंच महाराष्ट्र, मराठी भाषा आणि मराठी माणूस यासमोर कोणतेही आपले वैचारिक मतभेद अत्यंत क्षुद्र आहेत, अशी स्पष्ट भूमिका यावेळी राज ठाकरे यांनी मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.