
Operation Sindoor News : भारतानं 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देतानाच पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानामधील 9 अड्ड्यांवर 'एअर स्टाईक' केला आहे. भारतीय लष्कराच्या तिन्ही दलानं केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे (Operation Sindoor) आधीच बिथरलेल्या पाकिस्तानला आता 24 तासांच्या आतच दुसरा मोठा झटका बसला आहे.
भारतीय लष्करानं 'ऑपरेशन सिंदूर'ही मोहीम बुधवारी (ता.7 मे) मध्यरात्री फत्ते केली आहे. भारतीय सैन्यानं 9 दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले करत दहशतवाद्यांचे तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहेत. दोन आठवड्यांपासून भारताकडून पाकिस्तानवर (Pakistan) कारवाईचे स्पष्ट संकेत दिले होते. पण आता लष्करानं केलेल्या मोठ्या कारवाईमुळे पाकिस्तानची प्रचंड मोठी घाबरगुंडी उडाली आहे. या हल्ल्याचा फटका थेट शेअर मार्केटलाही बसला आहे.
भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे पाकिस्तान शेअर बाजार प्रचंड कोसळला आहे. तसेच सोन्याच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये प्रतितोळा सोन्याचा दर बुधवारी साडेतीन लाखांवर पोहचले आहेत. तसेच शेअर मार्केटमध्येही मोठीघसरण झाल्याचं दिसून आलं.
मिळालेल्या माहितीनुसार,पाकिस्तानमध्ये बेंचमार्क स्टॉक निर्देशांकात तब्बल 5.78 टक्के,तर केएसई 100 निर्देशांक 5.5 टक्क्यांनी घसरण झाल्याचं दिसून आलं. तर दुसरीकडे ऑल-पाकिस्तान जेम्स अँड ज्वेलर्स सराफा असोसिएशनच्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सध्या प्रतितोळा सोन्याचा दर 6 हजार 100 रुपयांनी वाढला असून तो 3,56,100 रुपयांवर पोहचला आहे.
विशेष म्हणजे भारताकडून युध्दाचे संकेत दिला जात असतानाच पाकिस्ताननेही युध्दाची जोरदार तयारी सुरू केली होती.त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये सातत्यानं सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.सोमवारी सोन्याच्या दरात प्रतितोळा 7 हजार 800 वाढ झाली होती. त्यामुळे पाकिस्तानात सोन्याचा दर त्यामुळे 3,50,000 रुपये झाला होता.पण आता त्यानंतर 24 तासांच्या आतच पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.
'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानी जनता आधीच जीव मुठीत धरुन भीतीच्या छायेखाली आहेत. यातच आता शेअर बाजार आणि सोन्याच्या रेटही वाढल्यामुळे नवं संकट पाकसमोर उभे ठाकलं आहे. याआधी भारतानं 'वॉटर स्ट्राईक' करत सिंधू,झेलम,चिनाब नदीचं पाणी रोखल्यामुळे पाकिस्तानची मोठी अडचण केली होती. तसेच व्यापारही रोखला आहे.
मोदी सरकारकडून गेले दोन आठवडे पाकिस्तानवर कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले जात होते. याचशिवाय सिंधू नदी पाणी वाटप करार रद्द करण्यापासून पाकिस्तानी नागरिकांना देशातून बाहेर काढण्यापर्यंत अनेक मोठे निर्णय घेतले होते. पण आता लष्कराने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांसह पाकिस्तानचेही धाबे दणाणले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.