
Opration Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारताने 'ऑपरेशन सिंदूर' च्या माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. भारताने 7 मे रोजी मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात 70 हून दहशतवादी ठार झाल्याची माहिती असून तीन प्रमुख दहशतवादी संघटनांची मुख्यालय उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. केंद्र सरकारने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या हल्ल्याची अधिकृत माहिती दिली. या प्रत्युत्तरानंतर संपूर्ण देशात काहीसे समाधानाचे वातावरण आहे.
ज्या पद्धतीने दहशतवाद्यांनी भारतात येऊन 26 निरपराध नागरिकांना लक्ष्य बनवलं होतं, धर्म विचारून कुटुंबीयांच्या समोरच अत्यंत जवळून डोक्यात गोळ्या घातल्या होत्या, त्याप्रमाणेच बदला घेण्याची भावना भारतीयांमध्ये होती. दहशतवाद्यांनी हल्ला करताना एका महिलेला 'हम तुम्हे नही मारेंगे, जाओ मोदी को बता देना, असे म्हणत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले होते. आता 15 दिवसात भारतीय लष्कराने या कारवाईला प्रत्युत्तर दिल्याने 'मोदीने बता भी दिया और उडा भी दिया' अशी अवस्था पाकिस्तानची झाली आहे.
पण याआधी भारताने अनेक बैठका घेतल्या. 15 दिवसांपासून या हल्ल्याचे नियोजन, अंमलबजावणी आणि नंतरचे परिणाम या गोष्टींवर चर्चा सुरु होती. नेमक्या 15 दिवस पडद्यामागे काय घडामोडी घडल्या?
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी, राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) 23 एप्रिल रोजी तपास सुरू केला. एनआयएच्या पथकांनी बैसरन खोऱ्यात तळ ठोकून तपास सुरू केला. याच दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्री, अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 24 एप्रिल सिंधू पाणी वाटप करार रद्द केला. पाकिस्तानला एक थेंबही मिळणार नाही, असा संदेश मोदी सरकारने दिला. पाकिस्तानची 80% शेती या पाण्याने सिंचनाखाली येती.
याच बैठकीत पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना 27 एप्रिलपर्यंत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. शिवाय भारतातील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यांची संख्याही कमी करून 55 वरून 30 पर्यंत घटवण्याचा निर्णय घेण्यात आला. भारताने पाकिस्तानसोबत सर्व प्रकारची आयात थांबवली. पाकिस्तानसोबतच्या सर्व प्रकारच्या पोस्टल आणि पार्सल सेवा बंद केल्या. पाकिस्तानची चहुबाजूंनी कोंडी करण्यात आली.
26 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, सीडीएस अनिल चौहान आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. ही बैठक सुमारे दीड तास चालली. यात पंतप्रधान मोदींनी सर्व दलांना पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले. कुठे, कधी आणि कसा हल्ला करायचा याचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य तिन्ही सेना दलांना असल्याचे सांगितले.
30 एप्रिल रोजी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पंतप्रधान मोदी यांची त्यांच्या 7 लोक कल्याण मार्ग येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हे देखील उपस्थित होते. 30 एप्रिल रोजी भारत सरकारने पाकिस्तानी विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. २३ मे पर्यंत हवाई क्षेत्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासोबतच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आली. भारताने 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल आणि अनेक सोशल मीडिया अकाउंट ब्लॉक केले. यामध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अधिकृत खात्यांचाही समावेश होता. 1 मे रोजी, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्याशी स्वतंत्र चर्चा केली. इथून भारताने राजकीय मुत्सद्देगिरी सुरू केली होती.
२ मे रोजी, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. एक तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी हल्ल्यानंतरच्या तयारीची माहिती दिली. 3 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता पुन्हा दिनेश त्रिपाठी यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली,सुमारे एक तास ही बैठक चालली. त्याच दिवशी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनीही पंतप्रधान मोदींची भेट घेतली. ही बैठक सुमारे 40 मिनिटे चालली.
एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांनी 4 मे रोजी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यात हल्ल्याच्या अंतिम तयारीवर चर्चा करण्यात आली. तयारी सुरु झाली. अतिशय विचारपूर्वक आखलेल्या रणनीतीनुसार, भारताने 7 मे रोजी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यात सैन्याने सुमारे 100 दहशतवाद्यांना ठार मारल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.