
Punjab's Stance on Water Allocation : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जलकरार रद्द करून पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. भारताने चिनाब नदीवरील धरणाचे सर्व दरवाजे बंद करत पाकिस्तानकडे जाणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे पाकला मोठ्या जलसंकटाला सामोरे जावे लागणार आहे. एकीकडे पाकड्यांच्या तोंडचे पाणी पळालेले असताना भारतातही पाण्यावरून दोन राज्ये भिडली आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यावरून तणाव वाढलेला आहे. तर दुसरीकडे पाकच्या सीमेवर असलेल्या पंजाब आणि शेजारील हरियाणामध्ये सतलज नदीच्या पाण्यावरून टोकाचे भांडण सुरू आहे. नदीवरील भाक्रा धरणातील पाणीवाटपावरून मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेला वाद आता चांगलाच वाढला आहे.
पाणीवाटपाचा मुद्दा संवेदनशील बनला असून पंजाबने सोमवारी विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशनही बोलावले आहे. या अधिवेशनामध्ये पंजाब सरकारकडून हरियाणाला अतिरिक्त पाणी न देण्याबाबतचा ठराव मांडून तो बहुमताने पारित केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे पंजाबमध्ये आपची सत्ता असताना विरोधी पक्षात असलेल्या भाजप आणि काँग्रेसचाही त्याला पाठिंबा आहे. हरियाणामध्ये भाजपचे सरकार आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी स्पष्ट केले आहे की, पाणी हा पंजाबसाठी संवेदनशील आणि जीवनाशी जोडलेला मुद्दा आहे. कोणत्याही परिस्थितीत आमच्या राज्याच्या हक्कांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. हरियाणा आपल्या वाट्याला आलेल्या पाण्यापेक्षा अधिक पाणी मागत आहे. पंजाबजवळ फालतू पाणी नाही. पंजाबच्या वाट्याचे पाणीच आम्ही वापरत आहोत, असे मान यांनी स्पष्ट केले आहे.
पंजाब आणि हरियाणामध्ये तेथील सरकारने सर्वदलीय बैठका घेतल्या आहेत. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांमध्ये भाजप, काँग्रेस आणि आपची भूमिका परस्परविरोधी आहे. दोन्ही राज्यांतील संबंधित पक्षाच्या नेत्यांकडून आपल्या राज्याचे हित विचारात घेऊन सरकारच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
यापार्श्वभूमीवर पंजाब सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात कार्य निर्णय़ होणार, याकडे सर्वांचेच लागले आहे. यातून राज्य पातळीवर तोडगा न निघाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जाण्याची तयारीही पंजाब सरकारकडून करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे केंद्र सरकारसमोर तोडगा काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.