New Delhi : नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी गुरूवारी पदभार स्वीकारला. त्याआधी त्यांनी 21 वेळा ओम श्री राम लिहिले. यावेळी शेजारीच उभे असलेले या खात्याचे राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांकडे पाहतच राहिले.
'ओम श्री राम' लिहिल्यानंतर नायडू यांनी हातातील घड्याळाकडे पाहिले आणि पदभार स्वीकारण्याच्या फाईलवर सही करायचे थांबले. त्यानंतर काही सेकंदांनी त्यांनी समोर उभ्या असलेल्या एकाकडे इशारा करून सही करण्याबाबत विचारणा केली. तिकडून होकार आल्यानंतरच नायडू यांनी फाईलवर सही केली.
मुरलीधर मोहोळ संपूर्ण वेळ नायडूंच्या शेजारीच उभे होते. त्यानंतर त्यांनीच नायडूंना पहिले पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. दरम्यान, मोहोळ यांनीही आजच राज्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपली भावनाही व्यक्त केली.
मोहोळ यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार भारताला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत. याच सरकारमधील एक महत्वाचा भाग असलेल्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार आज स्वीकारला. त्याआधी राम मोहन नायडू यांची भेट घेतली.
मंत्रालयाला आणखी उंचीवर घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. मागील दहा वर्षात मंत्रालयाने केलेल्या कामांमुळे लोकांना विविध उद्योगांमध्ये सुविधा मिळाल्या आहेत. रोजगारामध्ये वाढ झाली आहे. विमानतळांची संख्या वेगाने वाढत आङे. या क्षेत्रात आपण नवी उंची गाठत आहोत, असे मोहोळ यांनी म्हटले आहे.
जगभरातील देशांशी आपला कनेक्ट वाढला असून सामान्य लोकांचे विमान प्रवास करण्याचे स्वप्नही पूर्ण होत आहे. या सुविधांमुळे आर्थिक स्तरही बदलत आहे. त्यामुळे या मंत्रालयाची जबाबदारीही वाढली आहे. त्याला पुढे घेऊन जाण्यास आम्ही कटिबध्द असल्याचा निश्चय मोहोळ यांनी केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.