Maratha Reservation News : जरांगे-पाटलांनी सरकारला सोपा पेपर दिला, दिलीप पाटलांचा सवाल
Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे-पाटील 17 नोव्हेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. मराठा क्रांती मोर्चाने जरांगे-पाटील यांच्या बदलत्या भूमिकेला विरोध केला आहे. जरांगे-पाटील यांच्या भूमिका रोज बदलत आहेत. समाजाने कोणाकडे बघायचे? असा सवाल करत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षण याचिकाकर्ता दिलीप पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेत त्यांच्या बदलत्या भूमिकेला विरोध केला आहे.
मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले. राज्य सरकारला त्यांनी दोन वेळा अल्टिमेटम दिला. या वेळीदेखील त्यांनी 24 डिसेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र, या प्रश्नासंदर्भात आत्महत्या झाल्या. हे आंदोलन आत्महत्या होऊन मोठे होत असल्या तर चुकीचे असल्याचे मत दिलीप पाटील यांनी व्यक्त केले.
या दोन टप्प्यात मनोज जरांगे-पाटील यांची भूमिका बदलत आहे. त्यामुळे राज्य सरकारला वेळ मिळत आहे. कालही त्यांनी 'ईडब्लूएस' आरक्षणऐवजी 10 टक्के आरक्षणाची मागणी केली. ही कायाद्याच्या चौकटीत बसणार का? जरांगे पाटील यांची भूमिका त्यांचे सल्लागार बदलत आहेत का? असा सवाल दिलीप पाटील यांनी केला.
त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे मराठा समाजाची फसवणूक होत आहे. त्यांनी ज्येष्ठ वकिलांचा सल्ला घ्यावा, संघटनाही मदतीला येऊ शकतात. सल्ला घेऊनच भूमिका जाहीर करावी. त्यांनी सरकारला सोपा पेपर दिला. कुणबी प्रमाणपत्रावर घेणारे आरक्षण कायाद्याच्या चौकटीत टिकणार का? समाजावर परिणाम होणाऱ्या निर्णयासाठी सामाजिक सल्ला व विचार करून निर्णय घ्यावा, असा सल्ला दिलीप पाटील यांनी दिला.
जरांगे पाटलांनी बदललेल्या भूमिका
मराठवाड्यातील निजामाच्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
मराठवाड्यातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे.
निजामाच्या नोंदी चेक करून मराठा आणि कुणबी एक आहे हे सिद्ध करावे.
अखंड महाराष्ट्रामधील सर्व मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावे.
ओबीसीमधून आरक्षण द्यावे.
वेगळा प्रवर्ग करून आरक्षण द्यावे.
'ईडब्ल्यूएस' नको फक्त 10 टक्के आरक्षण द्यावे.