

अजित पवारांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. या दुर्घटनेत पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ते मुंबईहून बारामतीकडे प्रवास करत होते. विमान धावपट्टीवर उतरत असताना अचानक नियंत्रण सुटलं आणि ते थेट जमिनीवर आदळलं. जमिनीवर आदळताच मोठा स्फोट झाला, विमानाने पेट घेतला आणि काही क्षणांतच संपूर्ण परिसरात आग पसरली. अपघात अतिशय भीषण होता, त्यामुळे सर्वांनाच हादरवून टाकणारा ठरला.
या अपघातानंतर एक गोष्ट विशेष चर्चेत आली, ती म्हणजे विमानात असलेली कागदपत्रं आगीत जळाली नाहीत. इतक्या मोठ्या स्फोटानंतर आणि आगीमध्ये कागद सुरक्षित कसे राहिले, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. काहींनी तर या अपघातामागे घातपाताची शक्यताही व्यक्त केली. मात्र आता या सगळ्या शंकांपुढे महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
माजी एअर फोर्स अधिकारी अजय परांजपे यांनी या अपघाताबाबत तांत्रिक माहिती देत अनेक गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यांच्या मते, पवार यांच्या विमानाचा घातपात झाला असण्याची शक्यता फारच कमी आहे. इतक्या अचूक पद्धतीने घातपात करणं अत्यंत कठीण असतं. विमान अपघात हा कधीच एका कारणामुळे होत नाही, तर त्यामागे दोन किंवा तीन कारणांचा एकत्रित परिणाम असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
परांजपे यांनी बारामती विमानतळावरील परिस्थितीबाबतही माहिती दिली. मुंबईहून आलेलं विमान थेट धावपट्टीवर उतरू शकत होतं, कारण धावपट्टीची दिशा त्याच बाजूने होती. विमान वळवण्याची गरज नव्हती. त्या वेळी सूर्य उगवलेला होता, त्यामुळे सूर्यकिरणांमुळे पायलटला धावपट्टी न दिसण्याची शक्यता कमी होती. एअर ट्रॅफिक कंट्रोलने दृश्यमानता सुमारे तीन किलोमीटर असल्याचं सांगितलं होतं. मात्र बारामती विमानतळावर एअर कंट्रोनिक सुविधा नसल्याने तिथे किमान पाच किलोमीटर दृश्यमानतेची गरज असते, हेही महत्त्वाचं आहे.
विमान धावपट्टीच्या अगदी जवळ असल्याने त्याला जास्त उंची मिळाली नाही. रणवेचा अंदाज अचूक न आल्यामुळे विमान खाली कोसळलं, असं परांजपे यांनी सांगितलं.
कागदपत्रं न जळण्याबाबत बोलताना त्यांनी महत्त्वाचं कारण सांगितलं. विमान क्रॅश झाल्यानंतर त्याचे अनेक तुकडे होतात आणि स्फोटामुळे आतल्या वस्तू दूरदूर फेकल्या जातात. कागदपत्रं बांधलेली नसल्यामुळे ती आगीत अडकण्याऐवजी बाहेर उडाली असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे ती जळाली नाहीत, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.