
Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. सरकार स्थापन करीत असताना महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुख्यमंत्री पद, खातेवाटप, बंगले आणि आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे. अशातच एकनाथ शिंदे आणि अजित पवार गट काहीसे बॅकफुटला गेल्याचे जाणवत आहे. त्यातच आता भाजप आणि ठाकरे गटात जवळीक वाढत असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. याला कारणीभूत ठरत आहे, उद्धव ठाकरेंच्या लाडक्या आमदारांचे ट्वीट.
राज्यात अडीच वर्षापूर्वी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडल्यानंतर भाजप व ठाकरे गटात आडवा विस्तव जात नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसापासूनच राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठ्या फरकाने विजय मिळवल्यानंतर राज्याच्या राजकारणाने कूस बदलल्याचे दिसत आहे, त्यामुळे राज्यातील राजकारण बदलण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक सामन्यातून झाल्यानंतर हा राजकारणातील बदल सर्वांना जाणवत आहे.
निवडणुकीनंतर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर भाजपसोबत (BJP) जवळीक वाढवताना दिसत आहेत. त्यातच राज्यात तुटलेली 'युती जोडो अभियान' राबवत असल्याची चर्चा जोरात आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीसांना शुभेच्छा दिल्या होत्या. यानंतर 28 नोव्हेंबरला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं अभिनंदन केले. फडणवीसांनी सीएम पदाची शपथ घेतल्यानंतरही त्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या. एवढंच नव्हे तर अलीकडेच वाल्मिक कराडने आत्मसमर्पण केल्यानंतर मिलिद नार्वेकर यांनी फडणवीसांचे अभिनंदन केले. ठाकरे गटाचे निकटवर्तीय असणाऱ्या मिलिंद नार्वेकरांची ही भूमिका पाहता, ठाकरे गट आणि भाजप आगामी काळात एकत्र येऊ शकतात, अशा चर्चा सुरू आहे.
नागपुरातील हिवाळी अधिवेशनावेळी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी वेळ काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करीत भेट घेतली होती. त्यामुळे भाजप-सेना भविष्यात एकत्र येतील, अशा चर्चा सुरु झाल्यानंतर गेल्या काही दिवसापासून खासदार संजय राऊत यांनी 'सामना'तून केली जात असलेल्या टीकेची धार कमी करून देवेंद्र फडणवीस यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला गडचिरोली दौरा केला, त्यामुळे कौतुक केले आहे. त्याच्या एका दिवसापूर्वीच सामन्यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे डिप्रेशनमध्ये असल्याचे म्हटले होते. म्हणजे शिवसेना उबाठाकडून फक्त फडणवीस यांचे कौतुक करण्यात येत असून शिंदे यांच्या शिवसेनेवर मात्र टीकेचे बाण सोडले जात असल्याने त्याची सध्या जोरात चर्चा आहे.
ही चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु असतानाच महाविकास आघाडी सरकारमध्ये एकेकाळी मंत्री असलेल्या आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी मोठे विधान करीत या चर्चेला दुजोरा दिला आहे. त्यामुळे भाजपचा अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत प्रेमभंग झाला, तर राज्यात भाजप आणि ठाकरे गटात नवीन प्रेम कहाणी सुरू होऊ शकते, असे वक्तव्य कडू यांनी केले आहे. त्यामुळे बच्चू कडू यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यामुळे आता वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.