

Nagpur News: राज्यात महापालिका निवडणुकांसाठी सर्वचराजीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापवत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार घमासान सुरू असल्याचं दिसून येत आहे. यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 70 हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून होत असलेल्या आरोपांवर भाष्य करताना भाजपालाच कोंडीत पकडलं. यावरुन पुन्हा एकदा राजकारण तापलं असतानाच आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजितदादांना प्रत्युत्तर दिले आहे.
महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी(ता.6) माध्यमांशी संवाद साधला अजित पवारांच्या ज्यांनी माझ्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्यासोबतच मी आज सरकारमध्ये बसलो असल्याचं विधान केलं. याबाबत पत्रकारांनी बावनकुळे यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, "हे काही अभिमानास्पद नाही. न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.त्याचा निकाल काय येईल,त्यावर आपण पुढे जाऊ. शेवटी केस विचाराधीन आहे. अजून निकाल लागलेला नाही.''
बावनकुळे म्हणाले, "अजित पवार (Ajit Pawar) राज्यातील महत्त्वाचे नेते असून त्यांना फार सल्ला देणार नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये ते बरीच वर्षे सत्तेत होते.आता आम्ही मागची पाने पलटली,चाळली, तर त्यांना काही बोलता येणार नाही. मागची पाने उलटायची आमची इच्छा नाही. त्यामुळे अजित पवारांनी महायुतीच्या समन्वय समितीत जे ठरलं आहे,तसे वागावं असा सल्लाही त्यांनी यावेळी करुन दिला.
'खूप बोलता येईल,पण ही ती वेळ नसल्याचंही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. तसेच "अजितदादा प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी या बाबी बाहेर काढणे आणि एका महापालिकेसाठी महायुतीत मनभेद निर्माण करू नयेत.हे योग्य नाही. अजितदादा याचा विचार करतील, असंही बावनकुळे यांनी बोलून दाखवलं.
भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी महायुतीच्या समन्वय समितीतील ठरावाचा दाखला देत अजितदादांना सबुरीचा सल्ला दिला. ते म्हणाले, महायुतीच्या समन्वय समितीत मनभेद आणि मतभेद निर्माण होईल असं बोलायचे नाही,असं ठरलं होतं. तरी ते असं का वागले, असे का बोलले, याची मला कल्पना नाही. पण,त्यांनी असं बोलायला नको होतं असंही यावेळी बावनकुळे यांनी स्पष्टपणे सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचारसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर पुढच्या काही दिवसांतच राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एक गट भाजप-शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी झाला होता. यानंतर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीनं एकत्रित महायुतीत लोकसभा,विधानसभेच्या निवडणुकाही लढवल्या होत्या. पण महायुतीत अजित पवार रुळले असल्याचं वाटत असतानाच आता महापालिका निवडणुकीदरम्यान,राजकारण तापल्याचं दिसून येत आहे.
अजित पवारांवर गंभीर आरोप होत असलेल्या 70 हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशीची मागणी विरोधकांनी पुन्हा एकदा उचलून धरली आहे. यावर मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले,"70 हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी थांबवलेली नाही. सरकारकडून त्या-त्या प्रकरणात चौकशीची प्रक्रिया सुरू आहे. माझे मत आहे की, विरोधक आरोप करतात. त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहिलेले नाही. त्यातून काहीही आरोप करतात. लोकांचे मनोरंजन झाले पाहिजे", असा टोलाही विखे पाटलांनी अजितदादांना लगावला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.