
Nagpur News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. त्यानंतर बहुमत मिळालेल्या महायुतीने सत्तास्थापन केली. 5 डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार दहा ते 12 दिवस रखडला होता. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 मंत्र्यांनी शपथ घेतली.
खातेवाटपाबाबत महायुतीमधील घटक पक्षात जोरदार रस्सीखेच पहावयास मिळत आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून खातेवाटप रखडले आहे. त्यातच आता खातेवाटपाची चर्चा सुरु आहे. गेल्या सरकारमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली बहुतांश खाती तशीच राहतील, असा कयास असला तरी 'जुना फॉर्म्युला' जशाचा तसा लागू होणार नाही, अशी सुत्रांची माहिती आहे. (Maharashtra Cabinet Portfolio News)
महायुती सत्तेवर येऊन जवळपास 27 दिवस उलटत आले आहेत. पण अद्याप तरी खातेवाटप झालेले नाही. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मंत्रिमंडळ लवकर स्थापन होईल, खातेवाटप मार्गी लावून सरकार कामाला लागेल, असे वाटत होते पण प्रत्यक्षात मात्र उशीर होत असल्याने मुख्यमंत्री वगळता बाकी सगळेच बिनखात्याचे मंत्री आहेत.
गेल्या आठ दिवसापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यामध्ये खातेवाटपासाठी बैठकांचे सत्र सुरु आहे. त्याबद्दलची घोषणा दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ज्या प्रकारची नाराजी पाहायला मिळाली, तसे चित्र खातेवाटपानंतरही दिसू शकते. त्यामुळेच अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.
मनासारखे खाते मिळाले नाही तर नाराज झालेल्या मंडळींना प्रतिक्रिया देण्यास फारसा वेळ मिळणार नाही, असा सत्तेतील तीन प्रमुख नेत्यांना वाटते. त्यामुळे खातेवाटपास दिरंगाई होत आहे. अधिवेशन संपल्यानंतर लगेचच खातेवाटप केले जाणार असल्याची माहिती सूत्राने दिली.
खातेवाटपास उशीर होत असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा होती. अजित पवार (Ajit Pawar) हे अर्थ खात्यासाठी आग्रही आहेत. याशिवाय त्यांना पुण्याचे पालकमंत्रिपदही हवे आहे. यातील केवळ एक पर्याय निवडून तडजोड करावी, असे भाजपकडून अजित पवार यांना सांगण्यात आले असल्याचे समजते.
भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटील पुण्याच्या पालकमंत्रिपदासाठी उत्सुक आहेत. पुणे जिल्हा भाजपसाठी महत्त्वाचा आहे. या जिल्हयात महायुतीमध्ये भाजपचे आमदार सर्वाधिक आहेत. त्यासोबतच पुणे हे पश्चिम महाराष्ट्राचे प्रवेशद्वार समजले जाते, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.
गेल्या सरकारमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली बहुतांश खाती तशीच राहतील. त्यात फारसे बदल होणार नाहीत, अशी सुत्रांची माहिती असली तरी 'जुना फॉर्म्युला' जशास तसा लागू होण्याची शक्यता कमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गृह मंत्रालय स्वत:कडेच ठेवतील तर महसूल खाते भाजपकडेच राहणार आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याची जबाबदारी असेल तर शिवसेनकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यभार दिला जाईल. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ खाते दिले जाईल तर राष्ट्रवादी काँग्रेसला कृषी आणि अन्य मंत्रालये दिली जातील, अशी बातमी एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे. गेल्या सरकारमध्ये अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे होते. पण आता तसे होणार नाही, असे एकंदरीत दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.