
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवाऱ्या सध्या प्रचंड चर्चेत आहेत. गत महिन्यात गुरुपौर्णिमेदिवशी ते दिल्लीला गेले होते. त्यानंतर मागच्या एकाच आठवड्यात ते दोनवेळा दिल्ली दौऱ्यावर गेले होते. मागच्या दौऱ्यातील त्यांच्या भेटीगाठींची फारशी वाच्यता झाली नाही. पण यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली.
आता या भेटींमध्ये हवापाण्याच्या गप्पा तर नक्कीच झाल्या नसतील. त्यामुळे राजकीय वर्तुळात या दौऱ्यांची जोरदार चर्चा आहे. राज्याचे राजकारण करताना त्यांना दिल्लीचा आधार घ्यावा लागत आहे का? राज्यातील भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबावतंत्र आहे का? की ही भेट संवादसाखळीचा एक भाग होती? असे सवाल विचारले जात आहे.
5 जुलै रोजीच्या 'एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी' या उद्धव ठाकरे यांच्या वाक्याने शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा पाया रचला असावा. मुंबई महापालिकेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे शिवसेना आणि आपल्या राजकीय भवितव्याची शिंदे यांना चिंता वाटणे साहजिक आहे.
शिवसेनेचा भावनिक आधार एकनाथ शिंदे यांनी ओढून घेतला होता. आता दोन भाऊ एकत्र आल्याने हा भावनिक आधार परत ठाकरेंकडे जाण्याची भीती आहे. ठाकरे बंधू एकत्र आल्यास आपले महत्त्व कमी होणार असेल तर ते वाढवायचे कसे हे शिंदे यांच्या डोक्यात चालले असावे. त्यातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार आपल्या गळाला लावण्याचे प्रयत्न त्यांनी केल्याचे समजते.
एक-दोन जण सोडून इतर खासदार आपल्यासोबत आले तर मोदी-शाह यांच्या दरबारात आपले महत्त्व फारच वाढेल. केंद्रात आणखी एखाद्या मंत्रिपदाचे दार उघडले जाऊ शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांचा दबाव राहील असा होरा शिंदे यांचा होता. पण या खेळीत एकनाथ शिंदे यांना यश येऊ शकलेले नाही, अशीही माहिती आहे.
शिवसेनेकडे असलेल्या खात्यांमध्ये निर्णयांचे पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला आणि आपल्या मंत्र्यांना असावे, अशी आग्रही भूमिका एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्याकडे मांडली असल्याचे म्हंटले जाते. आपण मुख्यमंत्री नसलो तरी माझ्या पक्षाकडे असलेल्या खात्यांचा मी मुख्यमंत्री आहे असे समजून मला अधिकार द्या, अशी गळ त्यांनी घातली असावी.
देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीने, फडणवीस यांनी भर सभागृहात दिलेल्या ऑफरने आणि दोन्ही बाजूंनी कमी झालेल्या टीकेच्या धारेने शिंदे अस्वस्थ होणे साहजिक आहे. अर्थात याचा अर्थ ठाकरे भाजपसोबत जातील असे मुळीच नाही, तरीही आपले महायुतीतील आणि सरकारमधील महत्त्व कमी करण्यासाठी भाजपचे महाराष्ट्रातील नेतृत्व सतत काड्या टाकत आहेत, अशी शिंदे यांची पक्की धारणा आहे.
त्यामुळेच दिल्लीतील नेतृत्वाचा भक्कम पाठिंबा आपल्याला आहे हे दाखवण्याचा शिंदे यांचा वरचेवर प्रयत्न असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजपचे नेतृत्व त्यांना सन्मानाने सोबत घेऊन चालेल असे त्यांना वाटत असावे. त्याचवेळी राज्यातील भाजप नेतृत्व आपली डाळ शिजू देत नसले तरी दिल्लीचे भाजपश्रेष्ठी आपल्यासोबत आहेत हेही दर्शवण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असावा.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला काय होईल? हेही एकनाथ शिंदे यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. उद्या निर्णय विरोधात गेला तर आगामी निवडणुकीत फटका बसू शकतो. हे लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याबाबत त्यांनी दिल्लीत विचारविनिमय केला असावा.
एकूणच काय तर शिंदे यांचे वर्तमान सुरक्षित आहे, त्यांना चिंता आहे ती भवितव्याची. ते सुरक्षित करणे हा त्यांच्या दिल्ली दौऱ्याचा अर्थ असावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.