
Maharashtra Politics : हिटलरच्या छळ छावण्यांचा इतिहास पाश्चात्य देशांनी जतन केला व त्यातून नव्या पिढीने चांगला बोध घेतला. इतिहास मिटवायचा नसतो तर त्यातून बोध घ्यायचा असतो. दुसऱ्या महायुद्धावर इतके चित्रपट तयार झाले पण त्यामुळे युरोपात दंगली झाल्या का? तर नाही झाल्या. उत्तम रिसर्च करून ते चित्रपट तयार झाले. लोकांनी ते पाहिले, त्यामुळे त्यांना अहिंसेचे महत्वच समजले. भारतातील उच्चशिक्षित नेत्यांना युरोपला जाऊन फोटो काढायला आवडते.
पण युरोप इतका संपन्न का आहे ? याच्या मुळाशी जावे वाटत नाही, ही शोकांतिका आहे, अशा शब्दात एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी राज्यातील सद्य परिस्थितीवर आपली सविस्तर भूमिका मांडली. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नागपूरात काल याच कारणावरून दंगल घडली. गाड्यांची जाळपोळ, दगडफेक आणि पोलीसांवरील हल्ल्याने उपराजधानी हादरली. या पार्श्वभूमीवर इम्तियाज जलील यांनी परखड मतं मांडत राजकारणाला बळी न पडण्याचे आवाहन केले.
इम्तियाज जलील यांनी आपल्या सोशल मिडिया हॅन्डलवर सविस्तर प्रतिक्रिया देताना धार्मिक द्वेष, राजकारण करू पाहणाऱ्यांना फटकारले. (AIMIM) देशात होळी, रंगोत्सव, रमजान, लोहडी तसेच विविध प्रांतात वसंतोत्सव विविध पद्धतीने साजरा होत आहे. सामान्य माणसाला या उत्सवांच्या दरम्यान अर्थार्जनाची चांगली संधी असते. मात्र राजकीय वातावरण दुषित करून सर्वच धर्मियांमध्ये एक असुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचे काम राजकीय मंडळी करत आहेत.
ज्यांची आर्थिक स्थिती उत्तम आहे त्यांना या असुरक्षित वातावरणाची झळ पोहचत नाही. मात्र दररोज कमाई करून खाणारे अनेक लोक यामुळे भयाखाली जगतात. सणाच्या मांगल्यावर भयाचे सावट निर्माण होते ते वेगळेच. बोर्डापासून ते स्पर्धा परिक्षापर्यंत हजारो पेपर फुटीचे प्रकार घडत आहेत. रोजगाराच्या अपुऱ्या संधीमुळे छोट्या शहरातून प्रचंड प्रमाणात स्थलांतर, शेतमालाला हमीभाव मिळत नाही म्हणून शेतकरी कासावीस झालायं, गेल्या पाच वर्षात किती सिंचन क्षेत्र वाढले, याची आकडेवारी दिली जात नाही.
वाढती गुन्हेगारी म्हणाल तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घूण हत्या असेल, अक्षय शिंदेसारख्या आरोपीचे फेक एन्काऊंटर अशा घटनांमुळे प्रगतीशील विचारांच्या महाराष्ट्रात गुंडाराज निर्माण झाल्याचे चित्र आहे. यावर तर्क देण्याऐवजी आता औरंगजेबाची कबर उखडून काढण्याची टूम सुरू झाली आहे. या शहरात परवाच 900 मिमीची पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा करता आला नव्हता. पर्यायी पाणी पुरवठा योजनाच अद्याप पूर्णत्वास गेलेली नाही. आता निवडणूक झाल्यामुळे नेत्यांना त्यावर बोलायची गरजही वाटत नाहीये.
मुगल काळातील इतिहास उकरून काय साध्य होणार?
नेते आता 5 वर्षे निवांत होतील, ज्यामुळे लोकांच्या दैनंदिन जगण्यातील समस्यांमध्ये वाढच होत आहे. त्यावर एकही राजकारणी बोलत नाही. आदर्श पतसंस्था, मलकापूर बँक खातेदारांच्या समस्या यावर कोणी बोलणार आहे का? पर्यटन नगरी असलेल्या शहरात मुगल काळातील इतिहास उकरत बसल्याने काय साध्य होणार आहे?, असा सवालही इम्तियाज जलील यांनी केला. राष्ट्रीय माध्यमातून या पर्यटन शहराची बदनामी करण्याचे हे कारस्थान आहे. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वधर्मीय जनतेचे नुकसान होणार आहे.
बाबरी प्रकरण पेटवून भाजप मोठी झाली..
हे मी एक मुस्लिम म्हणून सांगत नसून एक भारतीय म्हणून सुद्धा सांगू इच्छितो. अनेक उद्योग येथे येण्यास उत्सुक आहेत. मात्र या शहराला दंगलीचे शहर म्हणून प्रकाशझोतात आणले जात आहे. पाणी नाही म्हणून उद्योग नाहीत, आता त्यात या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या शक्ती सक्रिय झाल्याचा आरोप इम्तियाज यांनी केला. बाबरी मशीद प्रकरण पेटवून भाजपा मोठी झाली. आता औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करायच्या धमक्या काही धर्मांध संघटना देत आहेत. त्यावर सत्ताधारी मौन आहेत.
इतकेच नव्हे तर शाहू, फुले व आंबेडकरांची परंपरा सांगणारेही मौन आहेत हे अधिक आश्चर्यकारक आहे. मी व माझ्यासारखे अनेक हिंदू -मुस्लिम, शीख, बौद्ध, इसाई या शहरात लहानाचे मोठे झाले. या शहरात औरंगजेबाच्या जयंत्या-मयंत्यांचे कधी उत्सव झालेले नाहीत, याचे साक्षीदार येथील हजारो नागरिक आहेत. पण जे या शहराला कधी ओळखत नाहीत त्यांनाच औरंगजेबाची सर्वाधिक आठवण येते, असा टोलाही इम्तियाज जलील यांनी लगावाला.
या देशात अनेक सुंदर इमारती, वारसास्थळे आहेत जी बौद्ध, मुगलकालिन, राजपुत, मराठ्यांचा इतिहास सांगणारी आहेत. अनेक सुरेख ब्रिटीशकालीन इमारती, यादवकालीन किल्ला आहे. या सगळ्याच वारसास्थळांचे जतन करण्याची तरतूद भारतीय घटनेत आहे. त्यामुळे कोणतीही हेरिटेज साईट उध्वस्त करण्याच्या धमक्या जेव्हा दिल्या जातात तेव्हा माध्यमांनी सर्वप्रथम इतिहास तज्ज्ञ , पुरातत्व विद्वान, वर्षोनुवर्षे उत्खनन करून इतिहासाची पाने लिहिणारे संशोधक यांची चर्चा घडवून आणली पाहिजे, असा सल्लाही इम्तियाज यांनी दिला.
५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.