
Shiv sena UBT News : अयोध्येत जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली, तेव्हा ते आमचे लोक नाहीत म्हणणारे हेच आता औरंगजेबाच्या नावाने महाराष्ट्रात अराजकता पसरवत आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. केंद्रात अन् राज्यात तुमची सत्ता आहे. मुख्यमंत्री तुमचाचच आहे मग एक पत्र पाठवा आणि उखडून टाका औरंगजेबाची कबर, यावरून समाजात अशांतता कशासाठी? असा सवालही दानवे यांनी केला.
औरंगजेब याची खुलताबाद येथील कबर उखडून फेकण्यासाठी बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसह विविध संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर औरंगजेब कबरीच्या भोवती मोठी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून भाजपाचे खासदार, मंत्री, आमदार औरंगजेबची कबर उखडून फेका यावर भाष्य करताना दिसत आहे. आमची देखील तीच इच्छा आहे, पण या गोष्टी कायद्याने कराव्या लागतील असे, फडणवीस यांनी म्हटले होते.
या सगळ्या प्रकारावरून राज्यातील वातावरण तापले असून शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी भाजपावर दुटप्पीपणाचा आरोप करत टीका केली आहे. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला आहे. महाराजांनी प्रतापगडाजवळ अफजलखानची कबर का ठेवली? इतिहास लोकांना माहिती पाहिजे, जे स्वराज्यावर आले त्यांना इथचं गाडलं. तसेच औरंगजेबलाही मराठ्यांच्या विरोधात आला त्यालाही इथे गाडलं गेलं हा इतिहास आहे.
कबर असावी, की नसावी याबाबत आमचे काही मत नाही. मूळात केंद्रात सरकार याचे आहे. एकीकडे संरक्षण द्यायचे आणि दुसरीकडे विरोध करायचा ही दुहेरी भूमिका का? असा प्रश्न अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर, राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात भाजप आंदोलन का करत नाही? मुख्यमंत्री फडणवीस सभागृहात त्यांना अटक करणार, असे सांगतात, मग ती का होत नाही? असेही दानवे विचारतात.
एक पत्र लिहा आणि काढून टाका..
औरंगजेबच्या विचाराला आमचा नक्कीच विरोध आहे. काही हिंदू संघटनांनी औरंगजेबची कबर हटवा, अशी मागणी जरुर केली आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये असे वातावरण नाही. मुळात केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आहे, मुख्यमंत्री त्यांचाच आहे, मग त्यांनी एक पत्र लिहावे आणि कबर काढून टाकावी. एकीकडे केंद्राकडून कबरीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी निधी दिला जातो.
दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री आंदोलनाची हाक देतात. म्हणजे दोन्ही बाजूने ढोल वाजवले जात आहेत, अशी टीका दानवे यांनी केली. बाबरी पाडताना ते आमचे लोक नाही म्हणणारे हेच आहेत. महाराष्ट्रात अराजकता पसरवण्याचा त्यांचा डाव आहे. नितेश राणे यांच्याविषयी बोलणं म्हणजे आपलं तोंड खराब करण्यासारखं आहे, ते मॅच्युअर नाहीत, अशा शब्दात दानवे यांनी टीका केली.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.