

रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाशी युती केली आहे.
या नव्या युतीमुळे कोकणात महायुतीचे समीकरण पूर्णपणे बदलले आहे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी या हालचालीमुळे भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे.
Raigad News : कोकणातील रायगडमध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील वाद काही केल्या मिटत नसल्याचे सध्याचे चित्र आहे. मंत्री भरत गोगावले आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या वादाची ठिणगी कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीत पडली असून येथे महायुती तुटली आहे. आगामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महायुतीतील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने युती केल्याचे जाहीर केले आहे. यामुळे स्थानिकच्या तोंडावर कोकणात राष्ट्रवादीची टिक टीक मशालीच्या प्रकाशात उजळणार असल्याचे आता बोलले जात आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कर्जत विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय समिकरणांचा उदय झाला असून राज्य सरकारमधील महायुती तुटल्याचे उघड झाले आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महायुतीमधून फारकत घेतली असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी सलगी केली आहे.
युतीसाठी हात पुढे करत नवीन युती करण्याची घोषणा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केली आहे. यामुळे आगामी नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणुका राष्ट्रवादी-शिवसेनेच्या झेंड्याखाली आता लढल्या जाणार आहेत. याची घोषणा कर्जत येथील रेडियन ब्लू रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्ष या दोन पक्षांच्या प्रमुखांच्या बैठकीत करण्यात आली. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असतानासुद्धा कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षातील विस्तव जात नाही. मागील विधानसभा निवडणुकीत ही दोन्ही पक्ष एकमेकांसमोर ठाकले होते.
त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे सूत जुळले आहेत. या दोन्ही पक्षांनी आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत गेल्या दोन महिन्यांपासून गुप्त बैठका सुरू होत्या. ज्यातून आगामी स्थानिकची राजनीती आखली जात होती. तर आता पहिल्यांदा याची घोषणा करण्यात आली आहे.
या बैठकीत कर्जत विधानसभा मतदारसंघातील कर्जत, खोपोली, माथेरान या तीन नगरपरिषद आणि खालापूर नगरपंचायत या निवडणुकीसाठी उमेदवार निश्चितीबाबत चर्चा झाल्याचेही कळत आहे. तर, तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी ही युती निवडणुकीला सामोरे जाणार आहे. याबाबत आता पुढील रणनीती देखील आणण्यात येणार आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा अध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा कार्याध्यक्ष अशोक भोपतराव,जिल्हा प्रवक्ता भरत भगत, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ धुळे, प्रदेश नेते भगवान भोईर यांच्यासह जिल्हा युवक अध्यक्ष तालुक्याच्या युवक, महिला तसेच अन्य सेलचे अध्यक्ष आणि तालुक्यातील पदाधिकारी आदी उपस्थित होते.
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, प्रभारी तालुका प्रमुख बाजीराव दळवी, तालुका संघटक बाबू घारे, तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर आदींसह युवासेना, महिला आघाडी तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
1. कोकणात कोणती नवी युती झाली आहे?
रायगडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने युती केली आहे.
2. या युतीमुळे कोणाला फटका बसला आहे?
या युतीमुळे महायुती तुटली असून भाजपला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.
3. युती कोणत्या निवडणुकीसाठी झाली आहे?
ही युती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी करण्यात आली आहे.
4. महायुती तुटल्याचे कारण काय सांगितले जाते?
रायगड आणि कोकणात जागावाटप आणि स्थानिक नेतृत्वावरून मतभेद निर्माण झाल्याने महायुती तुटली.
5. या युतीचा राज्यातील राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?
या युतीमुळे कोकणातील समीकरणं बदलण्याची आणि राज्यातील महायुतीवर दबाव येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.