

मुंबई हायकोर्टाने अंबरनाथ नगरपरिषदेत स्थापन केलेल्या सर्व समित्यांना स्थगिती दिली आहे.
शिंदे सेना आणि अजित पवार गटाने बनवलेली आघाडी वैध आहे की नाही, याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा असे निर्देश देण्यात आले.
भाजपने काँग्रेसच्या नगरसेवकांना सोबत घेऊन तयार केलेल्या नव्या आघाडीबाबतही संभ्रम कायम आहे.
Ambernath News : नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठे यश मिळाले. मात्र या आनंदाच्या क्षणांना न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे ब्रेक लागला आहे. अंबरनाथ नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या सभापती निवड व सहा विषय समित्यांच्या सभापतींची निवडीच्या सभेलाच न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच अंबरनाथमध्ये नव्यानं उदयास आलेली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी वैध की भाजप काँग्रेसची आघाडी खरी, याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, असेही निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. यामुळे अंबरनाथ नगर परिषदेत मोठा ट्वीस्ट आला असून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तणावपूर्ण बनण्याची शक्यता आहे.
अंबरनाथ नगर परिषदेच्या निकालानंतर येथे नाट्यमय घडामोडी झाल्या होत्या. सत्ता काबीज करण्यासाठी भाजपनं काँग्रेसशी हाथ मिळवणी करत युती केली. ज्यानंतर राज्यभरातून भाजपवर जोरदार टीका झाली होती. या टीकेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत काँग्रेससोबत युती होणार नाही, असे स्पष्टीकरण देत युती तोडली होती.
याच दरम्यान काँग्रेसने देखील भाजपशी युती करणाऱ्या नगर सेवकांना बाहेरचा रस्ता दाखवत कारवाई केली होती. ज्यानंतर काँग्रेसच्या नगरसेवकांना भाजप प्रवेश देत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली. तसेच सत्ता स्थापनेचा दावा करत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले होते.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून देखील सत्ता स्थापनेच्या हालचाली झाल्या आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रसच्या नगरसेवकांना हाताशी घेऊन शिवसेना अंबरनाथ महायुती विकास आघाडी स्थापन करत आपलं स्वतंत्र पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपची अंबरनाथ विकस आघाडी रद्द करत शिवसेनेच्या नव्या आघाडीवर शिक्कामोर्तब केला.
याच निर्णयाविरोधात भाजपच्या आघाडीनं हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली होती. ज्यावर आज (ता.19) सुनावणी झाली. यावेळी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने अंबरनाथमध्ये नव्यान उदयास आलेली शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी वैध की भाजपा नेत्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकांना हाताशी घेऊन केलेली नवी आघाडी खरी, याचा निर्णय आता जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा, असे निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात निर्देश देताना खऱ्या आघाडीचा निर्णय होईपर्यंत नगरपरिषदेच्या विविध समित्या स्थापनेला दिलेली स्थगिती कायम ठेवत असल्याचे स्पष्ट केलं आहे. तर दोन्ही आघाडींच्या सहमतीनं हे प्रकरण पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे निर्णयासाठी पाठवलं जात असून त्यावर निकाल येईपर्यंत दोन्ही आघाड्या स्थगित केल्या जात आहेत. आता यावर जिल्हाधिकाऱ्यांनी कायदेशीर तरतुदीनुसार निर्णय द्यावा, असे निर्देश देत हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढले आहे. दरम्यान आता भाजपसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीची धाकधूक वाढली आहे.
1) अंबरनाथ नगरपरिषद प्रकरणात हायकोर्टाने काय आदेश दिला?
हायकोर्टाने शिंदे सेना–राष्ट्रवादी काँग्रेसने स्थापन केलेल्या सर्व समित्यांना स्थगिती दिली आहे.
2) आता अंतिम निर्णय कोण घेणार आहे?
अंबरनाथ नगरपरिषदेत कोणती आघाडी वैध आहे, याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.
3) कोणकोणत्या आघाड्यांमध्ये वाद आहे?
शिंदे सेना–अजित पवार राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप–काँग्रेस नगरसेवकांची नवी आघाडी यांच्यात वाद आहे.
4) हा आदेश कधी देण्यात आला?
सोमवारी, 19 जानेवारी रोजी मुंबई हायकोर्टाने हा आदेश दिला.
5) या निर्णयाचा अंबरनाथ राजकारणावर काय परिणाम होईल?
नगरपरिषदेतील सत्तासंघर्ष अधिक तीव्र होण्याची आणि पुढील निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या निकालावर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.