

पनवेल महानगरपालिका निवडणुकीदरम्यान खारघर येथे निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर पुन्हा हल्ला झाला.
रॅलीचे चित्रीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कॅमेऱ्याची तोडफोड व शिवीगाळ करण्यात आली.
दुसऱ्या घटनेनंतर आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Panvel News : पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढलेला आहे. अशातच येथील खारघर येथे शिवसेना महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीदरम्यान निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याची घटना सोमवारी (५ जानेवारी) घडली होती. रॅलीचे चित्रीकरण करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना काही कार्यकर्त्यांनी दमदाटी करत हातातील कॅमेरा हिसकावून घेतला होता. तसेच कर्मचाऱ्यांना मारहाणही झाल्याचे समोर आले होते. ज्यानंतर सौम्य कारवाई करण्यात आली होती. केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संताप व्यक्त होत असतानाच दुसऱ्यांदा खारघरमध्ये निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत कॅमेऱ्याची तोडफोड करण्यात आली आहे. या प्रकरणी आता रुणीवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, हिरानंदानी परिसरात निवडणूक आयोगाचे स्थिर सर्व्हेक्षण पथक तपासणी करत होते. या तपासणीदरम्यान चित्रीकरण केले जात होते. अशावेळी पथकाला शिवीगाळ करत थेट कॅमेऱ्याची तोडफोड करण्यात आली. यामुळे खारघर पोलिसांनी मनाली नामदेव ठाकूर (वय २५) हिच्यावर भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला.
हिरानंदानी परिसरात जनार्दन पोपट सरडे आणि त्यांच्या पथकाची नेमणूकही निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आली होती. या दरम्यान वाहनांची तपासणी करत असताना पांढऱ्या रंगाची कार या ठिकाणी आली. जी संशयास्पद वाटत होती. यावेळी पथकाने तपासणीसाठी गाडी थांबवत तपासणी केली.
या तपासणीचे पियाशू पांडे चित्रिकरण करत होते. मात्र याच वेळी मनाली ठाकूर यांनी आक्रमक होत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. तसेच तुमची लायकी आहे का आमची गाडी तपासण्याची असे म्हणत पांडे यांच्याकडील कॅमेरा काढून घेत रस्त्यावर आपटला. यामुळे कॅमेऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर या प्रकारामुळे हिरानंदानी परिसरात काळ तणाव निर्माण झाला होता.
या प्रकाराची खारघर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनेच्या ठिकाणी जाऊन गोंधळ घालणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. तसेच खारघर पोलिस ठाण्यात आणून आणखी चौकशी केली. यावेळी मनाली ठाकूरवर भारतीय न्याय संहितेतील कलम १३२, २२१, ३२४(४), ३५२ आणि ३५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या याचा तपास केला जात असून सरकारी कामात अडथळा आणणे, कर्मचाऱ्यांना धमकावणे आणि शासकीय साधनसामग्रीचे नुकसान करणे या स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या घटनेमुळे खारघरमध्ये निवडणूक काळातील पुन्हा एकदा सुरक्षिततेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ५ जानेवारी रोजी जर निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करत कॅमेऱ्याचे नुकसान करणाऱ्यांना योग्य अद्दल घडविली असती तर आजचा प्रकार घडला नसता अशी आता येथे चर्चा सुरू झाली आहे. तर आता एकाच प्रकारचा गुन्हा झाला असताना पहिल्यांदा वळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता दुसऱ्यावर थेट गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्यानेही पोलिसांच्या एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय या भावनेवर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
1. ही घटना कुठे घडली?
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर येथे.
2. हल्ला कुणावर करण्यात आला?
निवडणूक आयोगाच्या कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर.
3. पहिल्या घटनेत कोणती कारवाई झाली होती?
केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता.
4. दुसऱ्या घटनेनंतर काय कारवाई झाली?
आरोपींवर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5. ही घटना कशाच्या पार्श्वभूमीवर घडली?
पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार रॅलीदरम्यान.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.