
सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला असून महत्त्वाचे नेते भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करत आहेत.
स्थानिक पातळीवर सत्ताधाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने शिवसेनेच्या संघटनेत फूट पडू लागली आहे.
या घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीला सिंधुदुर्गात बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Sindhudurg News : पुढच्या काहीच महिन्यात रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायत, नगरपरिषदांसह महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीचे महाविकास आघाडी समोर तगडे आव्हान असणार आहे. तसेच ते खासकरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या समोर देखील असणार आहे. कधीकाळी तळकोकणात मजबूत असणाऱ्या शिवसेनेतून आता सत्ता नसणे, नेते अन् पदाधिकार्यांमध्ये समन्वयाचा अभाव या कारणामुळे गळती लागली आहे.
या गळतीचा सत्ताधारी भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना उचलताना दिसत आहे. नुकताच असाच फायदा शिवसेनेनं उचलत मोठ्या नेत्याला पक्षात घेतले. याच नेत्याने जाताना शिवसेनेत संघटना बांधायला वाव आणि संधी नव्हती, असा आरोप केला आहे. या आरोपांमुळे आता आगामी काळ हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कसोटीचा काळ असणार असल्याचे संकेत दिले आहेत.
साडेतीन वर्षापूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता होती. मात्र सत्तेचे अडीच वर्षे बाकी असतानाच एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि शिवसेना दुभंगली गेली. एकाच पक्षाचे दोन गट तयार झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं भाजपबरोबर सत्तेत जाण्याचा मार्ग स्वीकारला. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरोधी बाकावर बसली.
दरम्यानच्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही ठाकरे यांना म्हणावे तसे यश आले नाही. उलट पक्षाला मोठा फटका बसल्याचेच दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर सध्या ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कसोटीचा काळ असून येथे पक्षातील महत्वाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व माजी खा. विनायक राऊत यांच्याकडे दिले आहे. पण नेते, पदाधिकार्यांमध्ये समन्वयाचा अभावामुळे वर्षभरात सुरू झालेले आऊट गोईंगचे सत्र अद्याप थांबलेले नाही. गेल्या वर्षभरात भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मोठ्या संख्येने शिवसेनेतील पदाधिकारी, सरपंच आणि कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. अलिकडेच माजी आमदार राजन तेली यांनी देखील पक्षाला जय महाराष्ट्र केला. तर वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे पक्षाला फटका बसत आहे.
नुकताच माजी आमदार राजन तेली यांनी देखील ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये समिकरणं बदलणार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्यासमोर कार्यकर्त्यांसह पक्ष संघटना बळकट करणे आणि ती टिकवण्याचे आव्हान असणार आहे.
सध्या मोजकेच नेते सक्रीय
सध्या जिल्ह्यात पदाधिकार्यांमध्येच मरगळ असल्याचे दिसत असून पक्ष नेतृत्वाचेही याकडे लक्ष नसल्याचे चित्र आहे. तर कुडाळ-मालवणचे माजी आ. वैभव नाईक, कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी आमदार जीजी उपरकर यांच्यासारखे काही मोजकेच नेते आवाज उठविताना दिसतात.
दरम्यान उद्धव ठाकरे यांच्याकडून जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नेते अन् पदाधिकार्यांमध्ये समन्व ठेवावा लागणार आहे. सध्याच्या घडीला जे कार्यकर्त्यांचे नेटवर्क उरले आहे. त्यांना पराभवाच्या मानसिकतेतून बाहेर पडून नेते, पदाधिकार्यांनी कार्यकर्त्यांना बळ देणे आवश्यक आहे. तरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये निभाव लागणार आहे.
प्र.1: सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणत्या नेत्यांनी शिवसेना सोडली?
👉 अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी शिंदे गट व भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
प्र.2: या घडामोडींमुळे ठाकरेंच्या शिवसेनेवर काय परिणाम होईल?
👉 संघटनात्मक पातळीवर ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
प्र.3: भाजप आणि शिंदे गटात इतके नेते का सामील होत आहेत?
👉 सत्तेचा प्रभाव आणि विकासाच्या संधींमुळे अनेक नेते सत्ताधाऱ्यांकडे वळत आहेत.
प्र.4: आगामी निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
👉 सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीला राजकीय आघाडी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
प्र.5: उद्धव ठाकरे गटाकडून यावर काय प्रतिक्रिया दिली गेली आहे?
👉 ठाकरेंच्या सेनेकडून या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.