

फेसबुकवरील ‘वधूवर’ पेजद्वारे महाडच्या तरुणाची लग्नाच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली.
अनाथ मुलीसोबत लग्न लावून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळले गेले.
कोल्हापुरात प्रत्यक्ष चौकशी केल्यानंतर अशा अनेक तक्रारी आधीपासून असल्याचे उघड झाले.
Raigad/Kolhapur Marriage Scam : ‘आमच्याकडे २१ ते ४० वयाच्या अनाथ मुली आहेत. जे कोणी लग्नाला इच्छुक असतील त्यांनी संपर्क करा’ अशी फेसबुकवरून जाहिरात करून महाडच्या कुटुंबाकडून पैसे उकळण्यात आल्याचा प्रकार आज उघड झाला. लग्नाच्या तयारीने हे कुटुंब कोल्हापुरात दाखल होताच संबंधित महिलेने फोन बंद केला. मंगळवार पेठ परिसरातील अनाथ आश्रमामध्ये चौकशी केली असता, अशा अनेक तक्रारी दाखल झाल्याचे तिथून सांगण्यात आले. याबाबत संबंधित कुटुंबाने पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार अर्ज दिला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मुलींचे शिक्षण, वाढत्या अपेक्षा यामुळे सर्व सामान्य कुटुंबातील मुलांची लग्ने ठरविण्यात अडथळे येत आहेत. महाड (जि. रायगड) येथील अशाच एका तरुणाने फेसबुकवरील ‘९६ कुळी मराठा वधूवर’ नावाच्या पेजवर महिला अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्नासाठी संपर्क करा, अशी जाहिरात ३१ मार्च रोजी पाहिली.
यानंतर त्याने दिलेल्या क्रमांकावर पूनम पाटील नावाच्या महिलेशी संपर्क साधत लग्नाबाबत चर्चा केली. यावर तिने विवाह नोंदणी व अनाथ आश्रम प्रवेश पासच्या नावाखाली ६५०० रुपये मागितले. हे पैसे पाठविल्यानंतर लग्नाची तारीख ठरवून आणखी ७ हजार रुपये ऑनलाईन मागवले.
मुलीशी बोलू देत नाहीत...
मुलाच्या कुटुंबाने नोंदणी केल्यानंतर त्या मुलीचा फोटो मागवला, तसेच तिच्याशी फोनवरून बोलण्याची विनंती केली. यावर संशयित पूनम पाटील हिने तेथील नियम कडक असून, कोणालाही बोलू दिले जात नाही. तुम्ही लग्नासाठी तयारीने या, आम्ही तयारी करून ठेवतो, असे सांगितल्याचे तक्रारदाराने सांगितले.
कुटुंब लग्नाच्या तयारीने पोहोचले...
महाड येथील कुटुंब आज लग्नाच्या तयारीने दागिने, साड्यांची खरेदी करून कोल्हापुरात दाखल झाले. पण, संबंधित वधूवर सूचक मंडळाशी संपर्क झाला नाही. त्यांनी याबाबत मंगळवार पेठ परिसरातील अनाथ आश्रमात जाऊन चौकशी केली असता, अशा अनेक तक्रारी यापूर्वीही आल्याचे सांगण्यात आले. हे ऐकून त्या कुटुंबाला धक्काच बसला. त्यांनी सामाजिक कार्यकर्त्या गीता हासूरकर यांच्याशी संपर्क केला. हासूरकर यांच्या मदतीने कुटुंबाने पोलिस अधीक्षक कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार दिली.
नोंदणीकृत वधूवर सुचक मंडळांकडेच जावे
कोल्हापूर जिल्ह्यात अनाथ आश्रमातील मुलींची विवाह करून देण्याच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. काही दिवसांपूर्वी साठ वर्षीय व्यक्तीलाही लग्न लावून देण्याच्या नावाखाली फसवणूक झाली आहे. यामुळे नोंदणीकृत वधू-वर सूचक मंडळांकडेच जावे, असे आवाहन गीता हासूरकर यांनी केले.
1. ही फसवणूक कशाप्रकारे झाली?
फेसबुकवरील वधूवर पेजद्वारे अनाथ मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून पैसे उकळण्यात आले.
2. पीडित व्यक्ती कुठली आहे?
पीडित तरुण रायगड जिल्ह्यातील महाड येथील आहे.
3. फसवणूक कोठे उघडकीस आली?
कोल्हापूरमधील मंगळवार पेठ परिसरातील अनाथ आश्रमात चौकशी केल्यानंतर प्रकरण उघड झाले.
4. अशा प्रकारच्या तक्रारी आधीही होत्या का?
होय, संबंधित आश्रमात अशा अनेक तक्रारी आधीपासून आल्याचे सांगण्यात आले.
5. नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
सोशल मीडियावरील अनोळखी जाहिरातींवर विश्वास ठेवू नये आणि आर्थिक व्यवहार करताना पडताळणी करावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.