

महाराष्ट्रातील सात राज्यसभा जागांसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करत धक्कातंत्राचा वापर केला.
कोकणातील चर्चेत असलेले खासदार धैर्यशील पाटील यांचे नाव यादीतून वगळण्यात आले.
या निर्णयामागे सुनील तटकरे यांचा प्रभाव आणि स्थानिक राजकीय समीकरणे कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
Raigad News : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सात जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने (ता.४) आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यावेळी देखील भाजपने धक्कातंत्रांचा वापर करत अनुभवी तर दोन नव्या चेहऱ्यांना संधी दिली. राज्यातील भाजपच्या वाट्याला जाणाऱ्या चार जागांसाठी मातब्बर नेत्यांनी उमेदवारासाठी पक्षनेतृत्वाकडे लॉबिंग केली होती. मात्र चर्चेतील नावेच वगळून भाजपने सगळ्यांनाच धक्का दिला आहे. यात कोकणातील चर्चेतील असणाऱ्या मातब्बर खासदार धैर्यशील पाटलांना देखील धक्का बसला आहे.
राज्यसभेतून राज्यातील ७ दिग्गज नेते निवृत्त होत असून त्यांच्या जागांवर पुन्हा १६ मार्चला निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणीला वेग आला असून महायुतीच्या वाट्याला ६ जागा आल्या. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला एक. या एका जागेसाठी जेष्ठ नेते शरद पवार यांचे नाव निश्चित झाल्याचे कळत आहे. महायुतीतील जागा वाटपातून भाजपला ४ आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक जागा आली आहे.
दरम्यान आज भाजपने आपली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने आपल्या कोट्यातून आरपीआयचे प्रमुख, मंत्री रामदास आठवले यांना राज्यसभेची जागा दिली आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे नेते तथा माजी आमदार रामराव वडकुते, नागपूरच्या माजी महौपर माया इनवनाते आणि विनोद तावडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. विनोद तावडे २०१४ पासून राज्यातील राजकारणापासून दूर होते. तर त्यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवत केंद्रात स्थान देण्यात आले होते. यानंतर त्यांनी, नुकताच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठं यश मिळवून दिले होते. यामुळेच त्यांना नेतृत्त्वाने हे बक्षीस दिल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान भाजपच्या कोट्यातून चर्चेत असणारे रायगड जिल्ह्यातील धैर्यशील पाटील यांचे नाव बाहेर पडले आहे. धैर्यशील पाटलांचे नाव चर्चेत आल्यानंतर जिल्ह्यात भाजपसह त्यांच्या गटात उत्साह होता. पण धैर्यशील पाटलांचे नाव कट झाल्यामुळे येथील कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. तसेच यामागे जिल्ह्यातीलच विद्यमान खासदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हात असल्याची चर्चा आहे.
नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा-पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकीत खासदार धैर्यशील पाटील यांनी जोडण्या लावत कमळ फुलवले होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपने येथे मोठी झेप घेतली होती. यानंतरच राज्यसभेवर पुन्हा एकदा त्यांना पाठवण्याची तयारी केली जात असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली होती. तसेच धैर्यशील पाटलांना पुन्हा संधी देत जिल्ह्यात भाजपची स्थिती आणखी भक्कम करण्यासह लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी केली जात असल्याचेही बोलले जात होते. याचा अर्थ जर भविष्यात महायुती फुटली तर तटकरेंच्या विरोधात तुल्यबळ उमेदवार म्हणून धैर्यशील पाटलांकडे पाहिले जात आहे.
कदाचित याच चर्चा आणि भविष्यातील राजकीय धोका लक्षात घेऊन धैर्यशील पाटलांचे नाव भाजपच्या यादीतून कट करण्यासाठी तटकरे यांनी आपले राजकीय वजन वापरले असावे. दिवंगत अजित पवार यांच्या नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे वजन वाढले आहे. याच गोष्टी पाहता भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून राज्यसभेसाठी धैर्यशील पाटील यांचे नाव कट केले असावे.
तर जिल्ह्यात नुकताच झालेल्या नगरपालिका, नगर परिषदा, जिल्हा परिषदा-पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणूका लक्षात घेवूनच शेकाप पक्षातून भाजप प्रवेश केलेल्या पाटील यांना पोटनिवडणुकीत राज्यसभेची उमेदवारी दिली होती. आता ग्रामपंचायींच्या निवडणुका शिल्लक राहिल्या असून त्या देखील लवकरच होती. यानंतर मोठी निवडून कोणतीच नाही. यामुळे देखील त्यांचे नाव कट केले असावे.
तसेच त्यांचे नाव यादीतून ऐन वेळी कट होण्याचे मोठे कारण म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत खासदार धैर्यशील पाटील यांची पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा नीलिमा पाटील यांचा झालेला पराभव देखील आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच खासदारांच्या पत्नीचाच पराभव झाला असेल तर पुन्हा राज्यसभेची उमेदवारी का द्यावी असाही कुठे तरी नेतृत्वाने विचार केला असावा. या सर्व बाबींमुळेच आता खासदार धैर्यशील पाटलांची टर्म केवळ २ वर्षांचीच ठरताना दिसत आहे.
1. भाजपने किती राज्यसभा जागांसाठी उमेदवार जाहीर केले?
महाराष्ट्रातील सात जागांपैकी भाजपच्या वाट्याला आलेल्या चार जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले.
2. धैर्यशील पाटील यांचे नाव का वगळले गेले?
यामागे स्थानिक राजकीय समीकरणे आणि पक्षांतर्गत निर्णय कारणीभूत असल्याची चर्चा आहे.
3. सुनील तटकरे यांचा या निर्णयात काही संबंध आहे का?
राजकीय वर्तुळात त्यांच्या प्रभावाबाबत चर्चा आहे, मात्र अधिकृत पुष्टी नाही.
4. उमेदवारीसाठी लॉबिंग झाले होते का?
होय, अनेक मातब्बर नेत्यांनी उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वाकडे लॉबिंग केल्याची माहिती आहे.
5. या निर्णयाचा कोकणातील राजकारणावर काय परिणाम होईल?
कोकणातील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.