

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप आणि शिवसेनेत जागावाटपावरून वाद निर्माण झाला आहे.
नारायण राणेंनी नितेश राणे, उदय सामंत आणि निलेश राणे यांना कान टोचले.
राणेंनी पालकमंत्र्यांना स्वबळाचा नारा देऊ नका असा इशारा दिल्यानंतरही शिवसेनेकडून चाचपणी सुरू आहे.
Sindhudurg News : जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावताना दिसत आहेत. महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी लढत होईल अशी असणारी शक्यता आता महायुतीतीच लढत होण्यावर आली आहे. येथे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून वाद सुरू झाला असतानाच खासदार नारायण राणे यांनी दोन्ही पालकमत्र्यांचे कान टोचत युतीबाबत बोट वरीष्ठांकडे दाखवले आहेत. तर या निर्णयात आपण देखील असू असे संकेत दिले आहेत. यामुळे पालमकमंत्री नितेश राणेंसह पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार निलेश राणे यांनी नमतं घेतल्याची चर्चा सुरू झाली होती. राणेंनी दम भरताच उदय सामंत,निलेश राणेंचा स्वबळाचं विमान जमिनीवर आल्याचे बोलले जात होते. मात्र नुकताच जिल्ह्यात झालेल्या विविध घडामोडीतून मात्र या दोघांचे विमान अद्याप हवेतच आणि तेही सुसाट असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात आगामी स्थानिकसाठी महायुतीतील भाजप आणि शिवसेनेकडून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. स्थानिकमध्ये आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा म्हणून विरोधकांसह आता मित्र पक्षाच्या पदधिकारी आणि कार्यकर्त्यांना फोडले जात आहे. पक्ष प्रवेशाचा सपाटाच लावून थेट अंगावर घेण्याची भाषा शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केली जात आहे. अशातच जिल्हा परिषदेसह नगरापालिका, नगरपरिषदा आणि पंचायत समित्यांवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावण्यासह सभापती आणि नगराध्यक्ष पदावरही हक्क पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह पालकमंत्री उदय सामंत करताना दिसत आहेत. यामुळे कोकणात सध्या महायुतीत वातावरण तंग झाले आहे.
अशावेळी खासदार नारायण राणे यांनी उदय सामंत यांच्या बालेकिल्ल्यात जावून जनता दरबार घेतला. येथे पक्षप्रवेशही घडवून आणत थेट इशाराच दिला. तसेच दोन्ही मुलांसह उदय सामंत यांनाही फटकारले. नितेश राणे आणि शिवसेना आमदार जेष्ठ सुपुत्र आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्यात असो किंवा कोकणात जिथे महायुती आहे तिथे आगामी निवडणुकांमध्ये युतीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त वरिष्ठांना आहे. पक्षासाठी हितकारक असेल तो निर्णय घेतला जाईल. तो माझ्यासहित सर्वांना बंधनकारक असेल. मग ते पालकमंत्री असले तरीही. यामुळे पालकमंत्री म्हणजे सर्वकाही नाही. हा अधिकार त्यांना नाही. कोणत्याही पालकमंत्र्याने अशा पद्धतीने निर्णय घेवू नये. युतीबाबत जो निर्णय पक्ष देईल तो निर्णय शेवट असेल असे म्हणत कान टोचले होते.
यानंतर मंत्री निलेश राणे यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया आली नव्हती. पण उदय सामंत आणि त्यांचे जेष्ठ सुपूत्र आमदार निलेश राणे यांच्याकडून स्वबळाचा सूर बदलला. पण त्यातही दबाव आल्यास तो झुगारुन भगवा फडकवू असा इशारा उदय सामंत यांनी दिला. यावेळी त्यांनी, खासदार नारायण राणे यांच्याशी मी आज सकाळीच चर्चा केली असून रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुती व्हावी यासाठी आम्ही दोघे आग्रही आहोत. याबाबत पक्षाच्या वरिष्ठांकडून लवकरच घोषणा होईल. नारायण राणे व आपण युती करून निवडणूक लढण्याच्या मानसिकतेत आहोत. लवकरच वरिष्ठ याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे म्हटले.
पण सिंधुदुर्ग येथे मेळ्याव्यात संपर्कमंत्री असणाऱ्या सामंत यांनी कार्यकर्त्यांना एकदिलाने लढण्याचे आवाहन केले. त्यांनी, कोणत्याही दबावाला बळी न पडता तो झुगारुन भगवा फडकवा. कुडाळ विधानसभा मतदारसंघातील 15 पैकी 15 जिल्हा परिषद जागांवर शिवसेना जिंकणारच आहे. महायुती असो वा मैत्रीपूर्ण लढत, आम्ही तयार आहोत. आपल्या आमदारावर कुणी आघात केला तर तो थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आघात मानला जाईल, असा इशारा दिला. तसेच शिवसेनेला कुठेच कमी लेखू नये, आम्ही संयमी आहोत. एक घाव, दोन तुकडे करणार नाही. महायुती झाल्यास सन्मान राखला गेला पाहिजे.पण महायुती झाली नाही तर उमेदवार उभे करण्याची तयारी ठेवा. मैत्रीपूर्ण लढतीसाठी सक्षम रहा. पण, नारायण राणेंचा शब्द आमच्यासाठी अंतिम असणार आहे, असेही सामंत यांनी नुकतेच म्हटले होते.
तर आमदार निलेश राणे यांनी, "सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीत आपली ताकद असून थांबायची वेळ निघून गेली आहे.आता हीच ती वेळ असून शिवसैनिकांनी तयारीला लागायला हवं. सावंतवाडी, कुडाळवर कोणाचा डोळा असेल तर त्याची किंमत मैदानात दाखवून देवू आता गप्पं बसण्याचे दिवस नाहीत. तीन पैकी दोन आमदार शिवसेनेचे आहेत. ही ताकद कोणी नाकारू शकत नाही. आमचे नेते युतीचा निर्णय घेतील. मित्रपक्षाची विधान बघता दोन दिवसांपूर्वी आम्ही स्वबळाचा नारा द्यावा लागला. आता आपली ताकद दाखवून द्यायची ही निवडणूक असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान आता पालकमंत्री उदय सामंत आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्या वक्तव्यामुळे सिंधुदुर्गमध्ये महायुतीत वाढण्याची शक्यता असून येथे मैत्रीपूर्ण लढतीच होतील अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. पण जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे सर्व लक्ष हे तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडे असून ते जिल्ह्यातील युती बाबत कोणता निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे.
1. सिंधुदुर्गमध्ये कोणत्या पक्षांमध्ये वाद सुरू आहे?
भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जागावाटपावरून वाद सुरू आहे.
2. नारायण राणेंनी कोणाला सुनावलं?
नारायण राणेंनी नितेश राणे, उदय सामंत आणि निलेश राणे यांना कान टोचले.
3. राणेंनी काय इशारा दिला आहे?
पालकमंत्र्यांनी स्वबळाचा नारा देऊ नये, असा कठोर इशारा त्यांनी दिला आहे.
4. तरीही कोण स्वबळाची तयारी करत आहेत?
उदय सामंत आणि निलेश राणे यांनी स्वबळाची चाचपणी सुरू ठेवली आहे.
5. या घटनेचा आगामी निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
या मतभेदांमुळे भाजप-शिवसेना युतीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.