

Maharashtra political news : भाजप मंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिता-पुत्रांवर जोरदार निशाणा साधला आहे.
मंत्री गणेश नाईक यांनी मुलाखतीत, 'उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या नावासमोर कायमचे माजी खासदार, असे लिहिवावा लागेल. फक्त पक्षाने आदेश दिला पाहिजे, ठाणे अन् पालघर जिल्हा लिड कर,' असा म्हणत घणाघात केला.
'सकाळ माध्यम समूहा'च्या साम मराठी वृत्तवाहिनीचे मुख्य संपादक नीलेश खरे यांनी भाजपचे (BJP) मंत्री गणेश नाईक यांची एका कार्यक्रमात जाहीर मुलाखत घेतली. या मुलाखतीत, मंत्री नाईक यांनी उपमुख्यमंत्री शिंदे पिता-पुत्रांवर पुन्हा एकदा घणाघात केला.
गणेश नाईक म्हणाले, "अजून देखील सांगतो, माझ्या नादाला लागला, तर ठाणे जिल्ह्यातील यांचं अस्तित्व, फक्त मला परवानगी मिळाली पाहिजे. गणेश नाईकांना भाजपच्या वरिष्ठांनी सांगितले पाहिजे, ठाणे-पालघर लीड कर, एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) एकही महापालिका येऊ देणार नाही. किंबहुना, कल्याणमध्ये त्यांचा पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, त्याला कायमचा माजी खासदार म्हणून लावावा लागेल."
'ठाण्यामधला आगाऊ खासदार, त्याला ओपन चॅलेंज आहे, त्याला आयुष्यभर माजी खासदार लावावा लागेल, मी नाही लावणार, कल्याण-ठाण्याची जनता लावेल, इथं फक्त गणेश नाईकांनी लीड घ्यायची गरज आहे. कारण हे भस्मासूर आहेत, बकासूर आहेत, यांच्यामुळे महाराष्ट्र राज्य दहा वर्षे मागं गेलं,' असे टोला देखील गणेश नाईक यांनी लगावला.
'यांनी खूप पापं केली आहेत, ती समोर आली ना, यांच्या जागा जेलमध्ये असतील. मी पुराव्यानिशी बोलतो, म्हणून म्हणतो अजून सुधरा, नवी मुंबईच्या जनतेच्या हितासाठी, सुविधांसाठी भूखंड द्या, एमआयडीसी द्या, आमचं काहीच नाही. पण आमच्या अस्तित्त्वाचा नाश करत असाल, तर तुम्ही कोण? परमेश्वर सोडून आम्ही कोणाला घाबरत नाही, आमचे हातपण साफ आहे अन् मन देखील साफ आहे,' असे गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं.
'इथल्या कॅसेट जातील, मी बोललो, अन् खरं आहे, कितीतरी लोकांच्या, गोरगरिबांच्या जमिनी, त्यांना न विचारता, बिल्डरांच्या नावावर केल्या आहेत. वनविभागाच्या जमिनी अतिशय चुकीच्या पद्धतीने, त्या धनिकांच्या नावावर केल्याचा प्रयत्न केला. यासाठी यंत्रणेचा अतिशय चुकीचा वापर केलाय. पण गणेश नाईक या वनखात्याचा मंत्री आहे. मंत्री असेपर्यंत वनांची एक इंच देखील जमीन कोणाच्या घशात चुकीच्या पद्धतीने जाऊ देणार नाही, ही आपली गॅरंटी आहे,' असे गणेश नाईक यांनी सांगितले.