
नितेश राणे यांनी चिपळूणमधील प्रशांत यादव यांना २०२९ निवडणुकीत आमदार करण्याचा विश्वास व्यक्त केला.
भाजप स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवण्याचे संकेतही त्यांनी दिले.
या वक्तव्यातून अजित पवार गटाला थेट आव्हान दिल्याचे मानले जात आहे.
Ratnagiri News : सध्या तळ कोकणात महायुतीत शितयुद्ध पाहायला मिळत आहे. येथे शिवसेना आणि भाजपमध्ये पक्ष विस्ताराची स्पर्धा लागली असून आता चिपळूण मतदार संघात चार वर्षाच्या आधीच आमदारकीवरून रस्सी खेच पाहायला मिळत आहे. काहीच दिवसांच्या आधी येथे शिवसेनेचे नेते पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह योगेश कदम यांनी कार्यकर्त्यांचा मेळाव्यात चिपळूणसह गुहागर मतदार संघात शिवसेना भगवा फडकवू असा अशी घोषणा करण्यात आली होती. त्याला काहीच दिवस उलटले तोच आता भाजप नेते तथा राज्याचे मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांनी देखील चिपळूणवर दावा केला आहे. त्यांनी प्रशांत यादव हेच भाजपकडून येथून लढतील आणि ते आमदार होतील असा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याने शिवसेनेच्या वाटेत भाजपकडून खोडा घालण्याचे काम सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. तर निलेश राणे थेट अजित पवार यांनाच भीडत असल्याचेही बोलले जात आहे. ते चिपळूण दौऱ्यावर आलेल्या मंत्री नितेश राणे यांनी प्रशांत यादव यांच्या भाजप प्रवेशाबाबत माहिती देताना बोलत होते.
यावेळी नितेश राणे यांनी, मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या 6 हजार मतांनी प्रशांत यादव मागे पडले. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे शेखर निकम आमदार झाले. पण यादव यांना येत्या पाच वर्षात भाजपकडून ताकद दिली जाईल. त्याच्या जोरावर 2029 च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदार संघातून तेच आमदारही होतील, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला. याचवेळी त्यांनी कार्यकर्त्याला न्याय मिळण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेतही दिले. त्यांच्या या संकेतांमुळे नितेश राणे यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान दिल्याचे बोलले जात आहे.
नितेश राणे म्हणाले की, काँग्रेस पक्ष आम्ही पाहिला आहे; परंतु भारतीय जनता पक्षासारखा पाठीशी उभा राहणारा दुसरा राजकीय पक्ष नाही. तेव्हा यादव यांच्या सोबतही ही ताकद कायम उभी राहील. आतापर्यंत मी स्वतः तीन निवडणुका लढलो आहे. परंतु 6 हजार 800 मतांच्या फरकाने निवडणुकीला सामोरे जाणे सोपे नाही. यादव यांनी आधीच स्वतःला सिद्ध केले असून, त्याचा भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत नक्कीच फायदा होईल.
मात्र त्यासाठी यादव यांना पद देऊन त्यांची ताकद वाढवायला हवी. त्यांच्या नावापुढे पद नसेल तर ते काय करणार? ते निधी कसा देणार असे प्रश्न असून, भाजप त्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हा नियोजनच्या निधी वाटपावरून माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी वेळोवेळी भूमिका मांडली. त्याचे कारणही तसेच आहे. राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूण विधानसभा मतदार संघासाठी 20-20 कोटीचा निधी दिला जातो; परंतु खासदार नारायण राणे यांच्या वाट्याला केवळ 5 कोटींचा निधी येतो. यासाठी जिल्हा नियोजन समितीत भाजपची ताकद दाखवण्याची गरज आहे.
आमदार भास्कर जाधव यांच्या वादग्रस्त पत्रकाबाबत राणे म्हणाले की, जाधव यांची ही भूमिका वैयक्तिक आहे की, ठाकरे सेनेची आहे? ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावे. ही भूमिका पक्षाची असेल तर त्याला आम्ही त्या पद्धतीचे उत्तर देण्यास तयार आहोत. उद्धव ठाकरे यांच्या मनाप्रमाणे काही नाही झाले की, त्यांना लोकशाही धोक्यात आल्यासारखे वाटते. लोकसभेत मनासारखे खासदार निवडून आले तेव्हा लोकशाही धोक्यात दिसली नाही. मनासारखे झाले नाही की, त्यांना न्यायदेवता आठवते, असा टोलाही राणे यांनी लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.