
Mumbai News : माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी राजकीय व्यासपीठावर भेट आहे. सन्माननीय राज ठाकरे असा उल्लेख करतो. राज यांनी अतिशय चांगली मांडणी केली आहे. आज आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे. तसेच आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, असे म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची तोफ डागली होती.
महायुती सरकारकडून हिंदीसक्तीचा निर्णय मागे घेण्यात आल्यानंतर उद्धव व राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्रित विजयी मेळावा घेतला. या मेळाव्यात राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याविषयीचे संकेतही दिले. या मेळाव्यावर राज्याचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फडणवीसांवर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यांनी दोन ठाकरे बंधू एकत्र आले ते चांगलंच झालं, पण यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं असा खोचक टीकेचा बाण सोडला आहे.
राणे म्हणाले, दोन कुटुंब एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे. हा त्यांच्या कुटुंबाचा विषय आहे. यांचा विषय तर थेट अंतरपाटापर्यंत गेला. आता यांच्यातील नवरा कोण आणि नवरी कोण हे शिवसेना-मनसेवाल्यांनी सांगावं, अशा शब्दांत डिवचलं.
याचवेळी त्यांनी नऊ महिन्याआधीच महायुतीला लोकांनी निवडून दिलं आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत आम्हीच निवडून येऊ, असा विश्वासही नितेश राणे व्यक्त केला.मुंबईतील हिंदू समाज आता यांना परत घरात बसवणार असंही ते म्हणाले.
विजयी मेळाव्याच्या स्टेजवर समाजवादी नेते, कॉम्रेड लोक दिसले,आता यांनी फक्त सीमीच्या दहशतवाद्यांशी युती करायची राहिली आहे अशी जिव्हारी लागणारी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली. तसेच विजयी मेळाव्याची मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जोरदार तयारी करण्यात येत असतानाच नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंचा हा मेळावा म्हणजे 'जिहादी सभा' असल्याचं म्हटलं होतं.
उद्धव ठाकरे यांच्या नरेंद्र मोदी कोणत्या शाळेत शिकले या खोचक टीकेवर नितेश राणे यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं.त्यांनी मोदी ज्या शाळेत शिकले, त्या शाळेत शिकण्याची यांची लायकी नाही असा चिमटाही राणे यांनी काढला.
एकट्या देवेंद्र फडणवीसांनी काय काय केलं हे महाराष्ट्रानं पाहिलं.दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर हिंदू विरोधी देशद्रोह्यांना सर्वात मोठा आनंद झाला असेल असा टोला नितेश राणे यांनी लगावला. विजयी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा उल्लेख अनाजीपंत असा करत त्यांनीच आपल्यामधील आंतरपाट दूर केल्याचे म्हटलं होतं. आता आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठीच असंही त्यांनी म्हटलं होतं.
अनेक बुवा, महाराज हे सध्या बिझी असून कुणी लिंबं कापतंय, कुणी गावाकडं जाऊन अंगारे धुपारे करतयं तर कोण रेडे कापत असेल. पण मी या सगळ्यांना एकच सांगतोय अशा सगळ्यांच्या विरोधात माझ्या आजोबांनी लढा दिला आहे. आम्ही त्यांचेच वारसदार आहोत. आज तुमच्यासमोर उभे आहोत. पण आता तुमच्या वापरा आणि फेका हे चालणार नाही. तुमच्या सारख्या नतद्रष्टांना आम्ही दोघं मिळून तुम्हाला फेकून देणार आहोत. शिवसेना प्रमुख नसते तर तुम्हाला कुणी ओळखतही नव्हतं, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.