
पहलगाम हल्ल्यानंतर आता भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला मोठा विरोध होत आहे.
काँग्रेस-शिवसेना (उबाठा) पाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील याला विरोध केला आहे.
माजी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनीही यावर प्रतिक्रिया देताना एकाच वाक्यात हा मुद्दा संपवत सामना होऊ नये अशी भूमिका घेतली आहे.
Nashik News : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला देश पातळीवर होताना दिसत असून काँग्रेस, आप यांसह इंडियाए आघाडीने जोरदार विरोध केला आहे. अशातच राज्यात देखील यावरून वाद होताना दिसत आहे. हा देशाच्या आणि शहीदांच्या भावनांचा अपमान असल्याचे म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याला विरोध केला आहे. यावरून सत्ताधाऱ्यांवर विरोधक तुटून पडताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा विषय एका वाक्यात संपवला. त्यांनी, भाजपवर हल्लाबोल देखील केली असून एकीकडे म्हणायचे पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही आणि दुसरीकडे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. जे योग्य नाही. ते पक्षाच्या नाशिकमधील शिबिरात पोहचल्यानंतर बोलत होते.
आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार की नाही अशी चर्चा रंगली होती. पहलगाम हल्ल्यानंतर असा सामना भारतीय टीमने खेळूच नये अशा प्रतिक्रिया उमटल्या होत्या. याचदरम्यान आता आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून आज रात्री (ता. 14 सप्टेंबर) भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे.
पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे बहुतांश भारतीयांकडून या सामन्याला टोकाचा विरोध होताना दिसत आहे. मात्र त्यानंतरही हा सामना होत आहे. मल्टी नॅशनल स्पर्धा असल्याने भारताला हा सामना खेळावा लागणार आहे. मात्र भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका होणार नाही असे म्हणत केंद्र सरकारने मात्र आता वेळ मारून नेली आहे.
यामुळे सध्या राज्यासह देशात संतप्त प्रतिक्रिया येताना दिसत असून जयंत पाटील यांनी देखील यावरून भाष्य केलं आहे. दरम्यानच्या काळात ते नाराज असल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या. पण आता ते पक्षाच्या शिबिरात पोहोचले असून या चर्चांना पूर्ण विराम लागला आहे.
यावेळी जयंत पाटील म्हणाले, पाकिस्तानने ज्याप्रकारे पहलगाम हल्ला केला त्यानंतर हा सामनाच खेळणे चुकीचे आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते एकीकडे म्हणतात की, खून आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही आणि दुसरीकडे क्रिकेट खेळले जाते. महिन्याला धोरण बदल असल्याचे दिसतंय, असाही टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. त्यांच्या या रोख-ठोक वक्तव्यामुळे आता या सामन्याला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाही विरोध असल्याचे दिसत आहे.
दरम्यान आज होणाऱ्या भारत पाकिस्तानमधील सामन्यास काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी देखील विरोध केला आहे. त्यांनी, 'व्वा मोदीजी व्वा, काय देशभक्ती आहे तुमची? एकीकडे तुम्ही सांगता की, ऑपरेशन सिंदूर सुरू आहे. आणि त्याचवेळी तुम्ही पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायला तयारही होता. भाजपचे सगळे नेते आता जय शहाच्या पुढे गुडघे टेकताना दिसत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.