

दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले की २०१४ पासूनची त्यांची लढाई शांततेसाठी होती, राणे कुटुंबाविरोधात नव्हती.
नितेश राणे यांनी केसरकरांच्या नारायण राणे संबंधित "कटकारस्थान" वक्तव्याची खिल्ली उडवत, त्यांचे दावे हास्यास्पद असल्याचे म्हटले.
दोन्ही नेत्यांच्या विधानांनी राणे कुटुंबाशी संबंधित जुना वाद पुन्हा एकदा राजकीय चर्चेत आला आहे.
Sawantwadi News : जिल्ह्यात एकीकडे भाजप-शिंदेची शिवसेना असा राजकीय वाद सुरू असतानाच तो व्यक्तिगत पातळीवर गेला आहे. नुकताच स्टिंग ऑपरेशनवरून सुरू झालेल्या वाद खासदार नारायण राणेंपर्यंत गेला आहे. नारायण राणे यांना संपविण्याचा कट रचला जातो, असा दावा शिंदेंच्यां शिवसेनेचे माजी मंत्री तथा आमदार केसरकर यांनी केला होता. जोरदार टोला लगावताना त्यांच्या विरोधात कोणी कट रचला असा सवाल करत राजकारणासाठी उगाच काहीतरी बोलून दिशाभूल करणे थांबवा असा बोचरा सल्ला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला होता. यावर आता केसरकर यांनी स्पष्टीकरण देत आपली बाजू मांडली आहे. त्यांनी, दहशतवादाचा मुद्दा घेऊन राणेंविरोधात २०१४ पासून मी काम केले, असे आमदार नितेश राणे म्हणत असतील तर ती माझी राजकीय लढाई शांततेसाठी होती, राणेंच्या विरोधात नव्हतीच असे उत्तर केसरकर यांनी दिले आहे. यामुळे तळकोकणात आता केसरकर विरूद्ध नितेश राणे असा वाद सुरू झाला आहे.
नुकताच तळकोकणात आमदार निलेश राणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे राजकीय वातावरण तंग झाले होते. यावरून दीपक केसरकर यांनी देखील तीव्र नाराजी व्यक्त करताना भाजपवर जोरदार टीका केली होती. तसेच येथे खासदार नारायण राणे यांचा शब्द पाळला जात नाही, त्यांचे राजकीय वजन कमी केलं जात आहे. तर त्यांना संपविण्याचा कट रचला जातोय, असा दावा केसरकर यांनी केला होता. ज्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यावरून केसरकर यांना भाजपकडून लक्ष केलं गेलं. भाजपचे जेष्ठ नेते प्रवीण दरेकर यांनी देखील यावरून भाष्य करताना राणेंची काळजी आपण करू नका त्यासाठी भाजप समर्थ असल्याचा टोला लगावला होता.
त्याचवेळी मंत्री नितेश राणे यांनी देखील केसरकर यांच्यावर पलटवार करताना, केसरकरच जर राणेंबद्दल बोलत असतील तर ते हास्यास्पद आहे. कथित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करून २०१४ पासून राणे कुटुंबाचे सर्वाधिक खच्चीकरण कोणी केले? निलेश राणे यांच्याविरोधात कोणी शड्डू ठोकला होता, हे सर्वज्ञात आहे. त्यामुळे राजकारणासाठी उगाच काहीतरी बोलून दिशाभूल करणे त्यांनी आता थांबवावे, अशी टीका त्यांनी केली होती.
तसेच कोणी कितीही डिवचण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही आमचा तोल ढळू देणार नाही. विकासाबाबत अपयशी ठरलेल्यांनी केवळ राजकारणासाठी प्रत्येक निवडणुकीत तेच तेच मुद्दे उगाळून जनतेमध्ये गैरसमज निर्माण करून देणे योग्य नाही. भाजपने नारायण राणे यांना मोठा मानसन्मान दिलाय.
राज्यसभेवर खासदार केलं. केंद्रीय मंत्री व आता लोकसभा खासदार ही पदे भाजपनेच त्यांना देऊन ताकद देण्याचे काम केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा आदर-सन्मान केला आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीदेखील त्यांचा यथोचित मानसन्मान राखला आहे. त्यामुळे उगाच कोणी गैरसमज पसरून आमच्या नेत्यांवर टीका करू नये, असे खडे बोल सुनावले होते.
काय म्हणाले केसरकर?
नितेश राणे यांनी आपल्यावर केलेले आरोपात तथ्य नसून आपण येथील दहशतवादाचा मुद्दा घेऊन राणेंविरोधात काम केलं आहे. ही राजकीय लढाई फक्त शांततेसाठी होती, ती राणेंच्या विरोधात नव्हती. मात्र ज्या ज्या वेळी मी राणेंसोबत राहिलो, त्यावेळी मी ठामपणे त्यांच्यामागे उभा राहिलो. हे जनतेला माहिती आहे. ते जनतेनं पाहिले आहे, असा पलटवार केसरकर यांनी नितेश राणेंच्या टीकेवर निवासस्थानी पत्रकार परिषद घेत केला आहे.
तसेच कोणी कितीही आरोप-प्रत्यारोप केले तरी सावंतवाडी पालिकेच्या निवडणुकीमध्ये मी आजपर्यंत शहरासाठी केलेले काम पाहावे आणि त्यानंतरच मतदान करावे, असेही आवाहन त्यांनी केले. तर ज्या पद्धतीने नितेश राणे यांनी आरोप केले आहेत. त्यात काहीच तथ्य नसल्याचे येथील जनतेलाही माहिती असल्याने असल्या भूलथापांना जनताही बळी पडणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मालवण येथील प्रकरणाबाबत केसरकर म्हणाले, ज्यांच्या घरात रक्कम सापडली, त्या घराच्या मालकावर गुन्हा दाखल होणे क्रमप्राप्त होते; परंतु आमदार राणेंवर गुन्हा दाखल होत असेल, तर ते चुकीचे आहे. माझ्या आजारपणावरून जर कोणी बोलत असेल, तर ते चुकीचे आहे. कणकवलीत शिवसेना पक्ष चिन्हावर लढत नसल्याने तिथे उपमुख्यमंत्र्यांची सभा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (ता. 30) सिंधुदुर्गात येत असून, मालवण, वेंगुर्लेनंतर सायंकाळी सावंतवाडी शहरात त्यांची सभा होणार आहे,अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
FAQs :
त्यांनी सांगितले की २०१४ पासूनची त्यांची राजकीय लढाई राणेंविरोधात नव्हती, तर शांतता प्रस्थापित करण्यासाठी होती.
काँग्रेसप्रमाणे दिशाभूल करणारी वक्तव्ये करत असल्याचा आरोप त्यांनी केसरकरांवर केला.
नारायण राणे यांना संपविण्याचा कट केसरकर यांनी असल्याचा दावा केला होता, ज्यावर राणेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
राणे कुटुंबाविरोधातील संघर्ष आणि त्यातील प्रमुख भूमिका याच कालखंडाशी संबंधित असल्याने.
शिवसेना-भाजप अंतर्गत मतभेद पुन्हा बाहेर पडत असून राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.