

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापले आहे.
उदय सामंत आणि नितेश राणे यांच्या वादात आता आमदार निलेश राणेंनीही एन्ट्री केली आहे.
यामुळे जिल्ह्यात महायुतीत फूट पडल्याची चर्चा सुरू असून स्थानिक पातळीवर नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sindhudurg News : तळकोकणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते तथा संपर्कमंत्री उदय सामंत यांनी युतीच्या मुद्यावरून भाजप नेते तथा पालकमंत्री नितेश राणे यांना चेतावणी दिली होती. त्याला आज नितेश राणेंनी उत्तर देत जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढती होतील अशी घोषणा केली. तर आता शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी देखील जिल्ह्यामध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे. येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेचाच भगवा फडकवणार असल्याचा दावा केला आहे. यामुळे जिल्ह्यातील महायुतीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात भाजपने स्वबळाचा नारा देण्यास सुरूवात केली होती. तोच नितेश राणे यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत आम्ही स्वबळावर आगामी निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जर कोणाला ताकद दाखवायची इच्छा असेल, तर ती त्यांनी दाखवावी. आम्हाला त्याच्याशी काही देण-घेणं नाही.
कोण काय बोलतं हे आमच्यासाठी महत्वाचं नाही. तर आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे काय बोलतात हे महत्वाचे आहे. आगामी स्थानिकबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचेही नितेश राणे म्हणाले. यामुळे आता दोन्ही जिल्ह्यात थेट लढतीचे चित्र भाजप विरूध शिवनसेना असेच असणार आहे.
तोच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असून आगामी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार आहे. त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घ्यावी, असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे. ते पावशी विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते. या मेळाव्याला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी आमदार राजन तेली, महिला सेना जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडतेंसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की, आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केले पण आता महायुती होणे शक्य नाही. त्यामुळे आपल्याला स्वबळावर निवडणूक लढवावी लागेल. आपली सुद्धा ताकद आहे हे जाणून घेवून प्रत्येक कार्यकर्त्यांने पक्ष जिकला पाहिजे यासाठी मेहनत घ्या. आता आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. या जिल्ह्याने राणे परिवाराला भरभरून दिले असून राणे कुटुंबाला खासदार आणि दोन आमदार दिले आहेत. हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाही, असेही निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
पण आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम आम्ही करणार आहोत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपला उमेदवार निवडून आला पाहिजे. यासाठी मेहनत घेतली पाहिजे असेही आवाहान त्यांनी केले आहे. दरम्यान आता निलेश राणे यांच्या या घोषणेमुळे राजन तेली ही गप्प झाले असून त्यांनी महायुतीवर बोलण्याचा कोणाला अधिकार नाही असे म्हणत जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांना झापलं होते.
तसेच स्व:ताला जिल्हापरिषद उमेदवारी मिळवण्यासाठी जिल्हाबँक अध्यक्षांनी अशी स्टेटमेंट करू नये. तो अधिकार जिल्हाध्यक्ष व जिल्हाप्रमुखांचा आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष जर बोलत असतील की युती होणार नाही तर ठीक आहे मात्र अजून महायुतीच्या बैठकाच झाल्या नाहीत तर कोणीही उठून स्वतःच्या स्वार्थासाठी युती होणार नाही असे बोलू नये असे म्हटले होते. पण आता राणे यांचे समर्थक असलेल्या जिल्हाबँक अध्यक्ष माने यांनी आधीच केलेल्या दाव्याप्रमाणे नितेश राणे यांनी जिल्ह्यात युती होणार नाही अशी घोषणा केली आहे. तसेच निलेश राणे यांनी देखील शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे सांगत महायुतीती फूट पडल्याचे स्पष्ट केले आहे.
1️. सिंधुदुर्गात राजकीय वाद का निर्माण झाला आहे?
स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेमुळे महायुतीतील नेत्यांमध्ये मतभेद वाढले आहेत.
2. निलेश राणे यांनी काय वक्तव्य केले?
निलेश राणेंनीही स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.
3️. याआधी कोणते नेते या वादात सहभागी झाले होते?
उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यात स्वबळावरून वाद झाला होता.
4️. महायुतीत फूट पडल्याची चर्चा का आहे?
तीघा नेत्यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे महायुतीची एकता धोक्यात आल्याची चर्चा आहे.
5️. या वादाचा स्थानिक निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
महायुतीच्या जागावाटपात अडचणी निर्माण होऊन स्पर्धा अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.