
Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘आका’ कोण असा सकाव करत उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी खळबळ उडवून दिली होती. तर त्यांनी आपला रोख शिवसेनेचे (शिंदे) आमदार नीलेश राणे यांच्यावर ठेवला होता. त्यानंतर या दोघातील वाद आता पुन्हा एकदा सुरू झाला आहे. तर या वादात ठाकरे गटाचे नेते माजी आमदार परशुराम उपकर यांनी देखील उडी घेतली आहे. नीलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यात टोकाची टीका सुरू झाली असून उपकर यांनी, राणेंनी टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी राणेंना इशारा देताना, टीका करण्याआधी त्यांनी विचार करावा, अन्यथा आमच्याकडेही त्यांच्या कुंडल्या असल्याचे म्हटलं आहे. यामुळे येथील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी येथे बिडवलकर हत्याप्रकरणावरून नीलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यातील वाद टोकाला गेला होता. तर या वादात मध्यस्थी करण्याचे काम उदय सामंत यांनी केले होते. तसेच त्यांना थेट शिवसेनेची ऑफर दिली होती. ज्यानंतर या दोघातील वाद काही काळ शांत झाला होता. तर वैभव नाईक उदय सामंत यांचा सल्ला घेऊन शिवसेनेत जातील अशा चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान आता पुन्हा एकदा वैभव नाईक यांनी नीलेश राणेंवर तोफ डागली असून राणेंना सिंधुदुर्गचा ‘आका’ व्हायचे असल्याने त्यांनी रवींद्र चव्हाण यांनाच बाजूला केल्याची टीका केलीय. तसेच विनायक राऊत यांच्यासोबत आम्ही सर्वजण एकदिलाने जनहिताचे काम करत असल्याचे स्पष्टीकरण देताना, ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणेंचे राजकीय अस्तित्व संपत चालले होते, त्यावेळी माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांना मोठी रसद पुरविली. लोकसभा, विधानसभा, जिल्हा बँक निवडणुकीसाठी ही रसद कामी आली. पण स्वतः जिल्ह्याचा ‘आका’ होण्यासाठी राणेंनी रवींद्र चव्हाण यांना पद्धतशीरपणे बाजूला केले. तर राणेंना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनाच बाजूला फेकल्याचा त्यांचा इतिहास आहे. यामुळे ही गोष्ट लक्षात घेऊनच त्यांनी टीका करावी, असाही सल्ला वैभव नाईक यांनी दिलाय.
तसेच सत्ताधाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत भ्रष्टाचाराचा, खंडणीचा धुडगूस जिल्ह्यात घातला असून याविरोधात आम्ही सातत्याने आवाज उठवीत आहोत. म्हणूनच जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी पालकमंत्री राणे हे आमच्याविषयी तथ्यहीन वक्तव्ये करत आहेत. राणेंनी आमच्यात फूट पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केला तरी आम्ही सर्व मंडळी एकत्र असून ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतील, तेथे सर्वजण ताकदीने आवाज उठविणार असल्याचेही वैभव नाईक यांनी म्हटलं आहे.
तर वैभव नाईक यांनी केलेल्या दाव्यावर नीलेश राणेंनी पलटवार करताना, वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनायच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यांनी काहीतरी नवीन निर्माण करावे. स्वतःच्या खिशात हात घालून सिंधुदुर्गासाठी काहीतरी निर्माण करा. केवळ तोंडाच्या वाफा सोडून तुम्ही केवळ ‘उपरकर’ होऊ शकता. लोक तुमचे नाव लक्षात ठेवतील असे कार्य उभे करा; अन्यथा तुमची ओळख ही राणेंचे विरोधक म्हणूनच राहील, असा टोला लगावला आहे.
यावेळी राणे यांनी, ‘आपल्यातील अनेकांना माहीत नसेल की परशुराम उपरकर म्हणजे कोण? माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्यासोबत राहून उद्धव ठाकरेंना टीप देणारे हे शिवसैनिक होते. त्यानंतर राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हाच्या पोटनिवडणुकीमध्ये या उपरकरांचे डिपॉझिट जप्त झाले होते. उद्धव ठाकरेंनी उपरकरांना विधान परिषद दिली; मात्र त्यानंतर ते मनसेत गेले. मनसेमध्ये गटबाजी केली, राज ठाकरे यांनी कार्यकारिणी बरखास्त करून यांची हकालपट्टी केली. आणि आता हेच उपकर पुन्हा ठाकरेंच्याबरोबर आहेत. जे साधी ग्रामपंचायतही लढू शकत नाहीत. यामुळे रिकामटेकडे असलेले वैभव नाईक यांनी उपरकरांप्रमाणे फक्त राणे परिवारावर टीका करण्याचा छंद जोपासू नये अशी खरमरीत टीका केलीय.
एकीकडे राणे-नाईक यांच्यात शाब्दीक युद्ध सुरू असतानाच उपकर यांनी देखील नीलेश राणेंना त्यांच्याच शब्दात उत्तर दिलं आहे. राणेंना राजकारणात आम्हीच आणले असून त्यांची ओळख राजन तेली व भाई गोवेकर यांना 1990 साली करून दिली होती. त्यावेळी निवडणूकही आम्ही जिंकलो होतो. तर माझी कोणत्याही पक्षाने हाकालपट्टी केली नसून राणे आणि राज ठाकरे यांच्यातील संबंधामुळे आपण मनसेपासून दूर होतो. पण आता गोष्ट निघालीच असेल तर नीलेश राणेंनी आणि त्यांच्या वडिलांनी आतापर्यंत किती पक्ष बदललेत याचंही उत्तर त्यांनी द्यावे. तर स्वार्थासाठी पक्ष बदलून जुन्यांवर टीका करण्याची सवय सोवाडी अशीही टीका उपकर यांनी केली आहे.
तसेच उपकर यांनी आपल्यासह वैभव नाईक यांच्यावर होणाऱ्या टीकेवर उत्तर देताना, वैभव नाईक असो किंवा आपण असो आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत. तर कासार्डेतील अवैध्य मायनिंग प्रश्न उचलून धरल्यानेच राणेंकडून बेच्छुट आरोप केले जातायत. राणे म्हणतात की मी ग्रामपंचायतही लढवली नाही. पण मी, दोन वेळी ग्रा. पं, दोन वेळा जि.प.त निवडून आलो आहे. त्यांच्या सारखा परदेशातून येऊन लोकांवर लादलेला मी नाही, अशा कडक शब्दात राणेंचा समाचार त्यांनी घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.