
रत्नागिरीत उदय सामंत यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवर टीका केली होती, ज्यामुळे महायुतीत वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
नंतर सामंत यांनी स्पष्टीकरण देत सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार आहेत.
चिपळूणमधील वक्तव्य नाईलाजाने करावे लागले, तसेच शिंदे साहेबांना त्रास होईल असे काही करायचे नाही, असे ते म्हणाले.
Ratnagiri News : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील जिल्ह्यांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीत शिवसेना नेते तसेच पालकमंत्री उदय सामंत आणि राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम आमने-सामने आले आहेत. निकम यांनी केलेल्या स्वबळाच्या घोषणेनंतर त्यांना भाजपकडूनही पाठींबा मिळाल्याने वातावरण अधिक तापले आहे.
यावर प्रतिक्रिया देताना उदय सामंत यांनी मित्रपक्षांची “खुमखुमी” काढत टीका केली. “त्यांना तसे वाटत असेल, तर आपणही शिवसेनेचा बाण कसा चालतो ते दाखवू,” असा इशारा देत त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वबळाची घोषणाच केली. या घटनाक्रमानंतर महायुतीत वादाला उकळी फुटली असून सामंत यांनी आता यावर स्पष्टीकरण दिले आहे.
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत महायुतीतील मित्रपक्षांमध्ये मतभेद उफाळले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी चिपळूण येथे भाजप आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या बैठकीचा समाचार घेतला. शिंदे सेनेला डिवचणाऱ्या मित्रपक्षांच्या नेत्यांना त्यांनी इशारा देत राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांच्यासह भाजपच्या नव्या नेत्यांनाही फटकारले.
“तुम्हाला लईच खुमखुमी असेल तर आत्ताच जाहीर करा, मग शिवसेनेचा बाण कसा चालतो हे दाखवू,” असा थेट इशारा सामंत यांनी दिला होता. यावर पलटवार करताना राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, “स्थानिक स्तरावरील नेत्यांच्या विधानांना फारसे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते आपले राजकीय वजन दाखवण्यासाठी असे बोलतात. महायुती एकत्र आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, उदय सामंत यांच्या या थेट इशाऱ्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.
आता सामंत यांनी बचावात्मक भूमिका घेतली असून त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार आहेत. चिपळूणमधील वक्तव्य नाईलाजाने करावे लागले. मला एकनाथ शिंदे साहेबांना त्रास होईल असे काही करायचे नाही,” असे म्हणत त्यांनी दोन पावले मागे घेतल्याचे सूचित केले.
तसेच त्यांनी, “विधानसभा निवडणुकीत शेखर निकम यांचे मताधिक्य केवळ साडेसात हजार होते. जर शिवसेना नसती तर काय झाले असते?” असा सवाल करत त्यांनी पुन्हा एकदा टोला लगावला. “लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महायुती म्हणून लढायच्या, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणे योग्य नाही,” असे मतही त्यांनी व्यक्त केले.
सामंत म्हणाले, “सध्या महायुतीत अंतर्गत धुसफूस असली तरी अंतिम निर्णय हा संबंधित पक्षांचे नेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे तिघेच घेतील. काही कार्यकर्ते आक्रमकपणे बोलतात, परंतु त्यांची मनं दुखावणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ.”
1. उदय सामंत यांनी महायुतीबाबत काय वक्तव्य केले?
→ त्यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढवल्या जाणार आहेत.
2. चिपळूणमधील वक्तव्याबाबत त्यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
→ सामंत म्हणाले की, ते वक्तव्य नाईलाजाने करावे लागले आणि त्याचा गैरअर्थ लावू नये.
3. त्यांनी भाजप आणि राष्ट्रवादीवर टीका का केली होती?
→ महायुतीतील स्थानिक नेत्यांनी स्वबळाचा नारा दिल्याने त्यांनी ‘खुमखुमी काढत’ टीका केली होती.
4. एकनाथ शिंदेंबद्दल उदय सामंत काय म्हणाले?
→ “शिंदे साहेबांना त्रास होईल असं काही करायचं नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.
5. सध्या महायुतीत वाद आहे का?
→ काही स्थानिक मतभेद असले तरी सामंत यांच्या म्हणण्यानुसार महायुती एकत्रच निवडणुका लढवणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.