
Ratnagiri News : गेल्या अनेक दिवसांपासून कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाकरे गटाला ऑपरेशन टायगर आणि भाजपच्या सत्तेतील वाढत्या प्रभावामुळे खिंडार पडत होतं. पण अशा वेळी ठाकरेंना त्यांच्या जुन्या शिलेदाराने हात देत काँग्रेसमधून ठाकरे गटात प्रवेश केला. काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने उतरती कळा लागलेल्या शिवसेनेला थोडा आधार मिळाला आहे. पण आता यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी, आम्ही कोकणात गद्दारांचे नामोनिशाण मिटवले असा टोला लगावला आहे. ते बुधवारी (ता.9) रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना बोलत होते.
एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि शिवसेना पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सत्तेतून पाय उतार व्हावं लागलं होतं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी कोकणासह राज्यात ऑपरेशन टायगर राबवत ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष केलं होतं. यामुळे अनेक माजी आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली होती. तर पक्ष फुटीचे लोन हे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून थेट ग्रामपंचायतपर्यंत पोहचले होते.
दरम्यान कोकणातील काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात मंगळवारी (ता. 8) प्रवेश करत शिवबंधन बांधले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. त्यावर सामंत यांनी पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार असून याच्याआधी त्यांनी कोकणातील गद्दारांना संपवा असे वक्तव्य केलं होतं. यावर सामंत यांनी, कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये आता गद्दार उरलेच नाहीत. या तिन्ही जिल्ह्यात विधानसभेला महायुतीच्या 15 पैकी 14 जागा आल्या आहेत. यामुळे आम्हीच गद्दारांचे नामोनिशाण मिटवल्याचा दावा सामंत यांनी केला आहे.
तसेच त्यांनी सहदेव बेटकर यांच्या शिवसेना प्रवेशावर देखील प्रतिक्रिया दिलीय. कोकणात महाविकास आघाडीच डॅमेज झाली असून ठाकरे यांच्या दौऱ्यावर कोणताच अक्षेप नाही. हा दौरा पक्ष वाढीसाठी असून त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष न देता आपण चांगलं काम करू. आम्ही या जिल्ह्यात शिवसेना वाढवली असून जिल्ह्यात काँग्रेसचा एकही जिल्हा परिषद सदस्य नाही. त्यामुळे बेटकर यांच्या प्रवेशाला काही महत्व नाही. यामुळे शिवसेनेचं काहीच नुकसान होणार नाही. उलट काँग्रेसचा नेता फोडून मविआत अलबेल नसल्याचे दिसत आहे.
मविआतील आपापसातील लोक आपल्याच पक्षातील लोक फोडत आहेत. यामुळे आम्ही डॅमेज झालो नसून येणारा काळच आता उद्धव ठाकरे गट किती वाढेल ते कळणार असल्याचा टोलाही सामंत यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.