
Ratnagiri News : गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना खिळखिळी करत आहेत. ठाकरे गटातील अनेक निष्ठावंत सध्या भाजप आणि शिवसेनेत स्थिरावले असून आता पक्ष बदलाचे लोन ग्रामपंचायत आणि नगरपरिषदेपर्यंत पोहचले आहे. यामुळे ठाकरे सेनेला लागलेली गळती कधी थांबणार? या कोकणातील राजकीय घडामोंडीकडे ठाकरे लक्ष देणार का? कोकणाचा दौरा करणार का? असा सवाल कार्यकर्ते करत असतानाच आता लवकरच ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर येणार असल्याचे संकेत माजी खासदार विनायक राऊत यांनी दिले आहेत. रत्नागिरी दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यामुळे सध्या जिल्ह्यातील हार्डकोर शिवसैनिकांमध्ये चैत्यनाचे वातावरण आहे.
भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रम आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरमुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे. जिल्ह्यात ठाकरे गटाला नेतृत्वच नसल्याचे समोर आले होते. यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्यासह माजी खासदार विनायक राऊत यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक नेत्यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला असून जे आता पक्षात आहेत त्यांना रोखण्याचे अवघड काम सध्या हे दोघे करत आहेत.
दरम्यान आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कोकणात येणार असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिलीय. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना, भाजप राजवटीकडून जी फसवणूक होत आहे त्याबद्दल जनतेत प्रचंड आक्रोश आहे. या आक्रोशाला साथ देण्यासाठीच उद्धव ठाकरे लवकरच कोकण दौऱ्यावर येणार असल्याचे राऊत यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, सध्या भाजप राजवटीकडून सर्वांची फसवणूक होत आहे. एसटी कामगारांची फसवणूक, लाडक्या बहिणींची फसवणूक, इतर योजना बंद पडल्या आहेत, पिकविमा कंपन्यांचा भरघोस फायदा करून देण्याचं काम हे सरकार करत आहे. या सर्वांविरोधात जनतेचा आक्रोश मोठा आहे. त्याला साथ देण्यासाठी ठाकरे कोकणात येणार आहेत.
महावितरणकडून प्रीपेड मीटर बसवण्यात येत आहेत; पण रत्नागिरीत प्रीपेड मीटर लावू देणार नाही. हे प्रीपेड मीटर बसवले तर त्याची होळी केली जाईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग महाराष्ट्रातील ड्रगमाफियांचा अड्डा बनू लागलेला आहे. अनेक ड्रगमाफिया सध्याच्या शासनकर्त्यांच्या आशीर्वादाने व्यवसाय करत आहेत. जरी पोलिसांनी कारवाई केली तरीही त्याच्या शतपटीने ड्रगचा व्यवसाय कसा सुरू होतो, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
यावेळी त्यांनी नुकताच प्रवेश केलेले काँग्रेस नेते सहदेव बेटकर यांच्यावर देखील भाष्य केलं. बेटकर हे स्वतःच्या मनाने ठाकरे शिवसेनेत आलेले आहेत. त्यांना कोणतेही आमिष दाखवलेले नाही. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी ते आलेले आहेत. तिकडे आत्ताचे जे काही पक्षप्रवेश होत आहेत ते पाच-पंधरा लाख घ्या आणि माझ्याकडे या, अशा बोलीवरील आहेत. पक्षप्रवेश करून घ्यायचा आणि त्यानंतर तोंडाला पाने पुसायची, अशी स्थिती तिकडे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.