
Raigad News : राज्यात बालविवाह कायदा करण्यात आला आहे. ग्रामस्तरावर ग्रामसेवकांना कायद्याचे प्रशिक्षणही दिले जात आहे. पण कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही असेच काहीसे चित्र महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्याच रायगड जिल्ह्यात दिसत आहे. जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण वाढले असून गेल्या नऊ महिन्यांत तब्बल 21 बालविवाह प्रतिबंधक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे महिला व बाल विकास मंत्र्यांच्याच जिल्ह्यात बालविवाह का थांबत नाहीत? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.
राज्यात महिला सक्षमीकरणाच्या गाजावाजा केला जात असून बालविवाह प्रतिबंधक कायद्याद्वारे विवाह रोखण्यात येत असल्याचे सांगत सरकार पाठ थोपवून घेत आहे. तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या आंतरराष्ट्रीय बालिका दिना निमित्त आदिती तटकरे यांनी सोशन मिडियावर खास पोस्ट केली होती.
त्यांनी, प्रत्येक मुलगी ही शक्ती, आशा आणि प्रगतीचा स्रोत आहे. शिक्षण, समानता आणि संधी याद्वारे तिला सक्षम बनवणे हाच उज्ज्वल भविष्य घडवण्याचा खरा मार्ग आहे. चला प्रत्येक मुलीचे संगोपन, संरक्षण आणि आदर करण्याचा संकल्प करूया. असे म्हटले होते. मात्र आदिती तटकरे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या रायगड जिल्ह्यातच बालविवाहाच्या प्रकरणांनी थैमान घातल्याचे दिसत आहे.
एकट्या रायगडमध्ये गेल्या 9 महिन्यांत तब्बल 21 बालविवाह प्रकरणात गुन्हे दाखल झाले आहेत. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे 348 अल्पवयीन मातांची नोंद देखील जिल्हा सामान्य रुग्णालयात झाल्या आहेत. यामुळे आता कायदा असूनही त्याची अंमलबजावणी नसेल, तर तो काय कामाचा असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
एकीकडे कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधणकारक आहे. मात्र मंत्री तटकरेंच्या जिल्ह्यात वेगळीच परिस्थिती आहे. जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये 14 ते 17 वयोगटातील मुलींचे विवाह सर्रास लावले जात आहेत. असे प्रकार वाढत असताना ग्रामसेवक, महिला व बालविकास अधिकारी आणि पोलीस प्रशासन पूर्णपणे निष्क्रियपणे काम करत असल्याचेही दिसत असल्याचा आरोप येथे केला जातोय.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या आदिती तटकरे यांच्या जिल्ह्यातच प्रशासनाचा या प्रकरणात ढिसाळपणा उघड होत आहे. बालविवाहामुळे येथील अल्पवयीन मुलींवर शारीरिक, मानसिक व भावनिक परिणाम होताना दिसत आहेत. तर आई व बाळाच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होत आहे. त्याचबरोबर बालविवाहामुळे त्या मुलीचे शिक्षण अर्धवट राहत आहे.
धोरणं केवळ कागदावरच
एकीकडे राज्यातील लाडक्या बहिणींना "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" सन्मान द्यायचा. त्यांना निधी देवून महिला सक्षमीकरणाची ग्वाही द्यायची. मात्र दुसरीकडे तटकरे यांच्या जिल्ह्यातच बालविवाह होताना दिसत आहे. यामुळे कायदा, धोरण आणि अशा योजना फक्त कागदी घोडेच नाचवल्यागत असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या रूपाली भाटे यांनी दिली आहे. तसेच त्यांनी स्त्री-सन्मान, आरोग्य आणि बालपण वाचवण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाची जबाबदारी नसून बालविवाह रोखण्यासाठी कठोर अंमलबजावणी हवी, अशी मागणीही केली आहे.
348 अल्पवयीन मातांची नोंद
जिल्ह्यात 9 महिन्यांत तब्बल 21 बालविवाह प्रकरणात गुन्हे दाखल झाले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात अल्पवयीन मातृत्व नोंदणीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. जिल्ह्यात 2024 मध्ये 237 तर सप्टेंबर 2025 अखेरपर्यंत 111 अल्पवयीन मातृत्व नोंदी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
बालविवाहाचे ‘हॉटस्पॉट’
कायद्यानुसार विवाहासाठी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे बंधणकारक असतानाही जिल्ह्यातील ग्रामीण व आदिवासी भागांमध्ये बालविवाह सर्रास होताना दिसत आहे. पोलीस ठाण्यातील नोंदणीनुसार जिल्ह्यात 13 ‘हॉटस्पॉट’ समोर आले आहेत. ज्यात तळा (4), रोहा (3), कोलाड, वडखळ, पोयनाड (प्रत्येकी 2), पाली, मांडवा, म्हसळा, रसायनी, मुरुड, अलिबाग, नागोठणे, महाड उपविभागात प्रत्येकी 1 गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या प्रकरणी मंत्री आदिती तटकरे यांच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो झालेला नाही. त्यामुळे याच्यावर त्यांची अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.