
Mumbai News : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास चार वर्षांचा कालावधी झाला आहे. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतीची निवड करण्यात आली तर दुसरीकडे आजच रिक्त असलेल्या विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून रिक्त असलेलया विधानसभेच्या विरोधी पक्ष नेत्याच्या निवडीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात बोलताना सूचक विधान केले. विरोधी पक्षाला आता संधी नाही. विरोधी पक्ष नेहमीच असमाधानी असतो, कधीच समाधानी नसतो. त्यामुळे तुम्ही असमाधानी राहा, अशी खोचक टीका फडणवीस यांनी यावेळी केली. त्यामुळे आता निवड कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बुधवारी विधानसभा उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्याचवेळी सभागृहातील सर्व सदस्य व विशेषतः विरोधी पक्षांचे आभार मानतो, त्यांनी ही निवड बिनविरोध केली. अण्णांना विनंती करतो, या खुर्चीवर दोन्ही कान शाबूत ठेवावेत, असा सल्ला देखील सीएम फडणवीस यांनी यावेळी दिला.
त्यासोबतच यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधी पक्षनेते पदाबाबत सूचक विधान केले. बाजुच्या खुर्चीचा निर्णय ज्यादिवशी अध्यक्ष घेतील तो आम्हाला मान्य असेल. तोपर्यंत बाजुची खुर्ची काही काळ रिकामी राहू द्या, असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे या अधिवेशनात विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड नाहीच का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, विरोधी पक्षनेते पदासाठी ज्यांचं नाव चर्चेत आहे, त्या भास्कर जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “विरोधी पक्ष नेत्याची निवड करायची नसेल, तर सरकारने जाहीर करावे. आम्ही आमच्याकडून प्रयत्न केला. अध्यक्षांना पत्र दिले आहे. सरकारकडे बहुमत आहे, तरी सरकार का घाबरतय?” असा सवाल भास्कर जाधव यांनी केला.
विधिमंडळाच्या नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, असे सर्वाना वाटत होते. त्यानंतर या अर्थसंकल्पिय अधिवेशनात राज्याच्या विरोधी पक्षनेत्याची निवड होईल, असे वाटत होते. मात्र, अधिवेश संपत आले तरी विरोधी पक्ष नेत्याची निवड करण्यात आली नसल्याने विरोधी पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात नाराजी पसरली आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.