

Mumbai News : राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी समारोप झाला. 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेले हे अधिवशेन विविध विषयांनी गाजले. याच अधिवेशनात ६ मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडला. अधिवेशनाला शेवटचे चार दिवस शिल्लक असताना भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण उघड झाले. त्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची संधी चालून आली असताना विरोधकानी गमावली आहे. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ आमदार निवृत्त होणार असल्याने त्यांना निरोप देण्यात आला. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनातील उद्धव ठाकरे यांची हजेरी कमी, पण भाषणाची धार मात्र त्यांनी कायम ठेवल्याचे पुढे आले आहे.
राज्यात पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकानंतर राजकारण तापलेले आहे. त्यातच विरोधक म्हणून सरकारला धारेवर धरण्याची संधी असताना उद्धव ठाकरे यांच्या सर्वोच्च नेत्याची ही कमी उपस्थिती कायमच अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली आहे. महिनाभर सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे यांनी फक्त 4 वेळा विधानभवनात पाऊल ठेवले. त्यामध्ये त्यांनी दोनदा अधिवेशन काळात भाषण केले असल्याचे पुढे आले आहे.
अधिवेशन काळात उद्धव ठाकरे यांची मोजकीच उपस्थिती विरोधकांना टीका करण्यासाठी आयते कोलीत मिळाले आहे. माजी मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे यांनी संसदीय कामकाजावेळी लावलेली हजेरीमुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. उद्धव ठाकरे सभागृहात 23 फेब्रुवारीला अधिवेशनाचा पहिला दिवस असल्याने हजर होते. त्यानंतर 6 मार्चला अर्थसंकल्पीय चर्चा आणि इतर घडामोडींमुळे उपस्थित होते.16 मार्चला कामकाजाचा एक महत्त्वाचा दिवस असल्याने हजर होते तर 24 मार्चला अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि निरोप समारंभ असल्याने त्यांनी हजेरी लावली.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विधानपरिषदेचे सदस्य असल्याने त्यांनी या महिनाभराच्या कालावधीत सभागृहात दोन वेळा भाषण केले. विशेष म्हणजे, ही दोन्ही भाषणे धोरणात्मक निर्णयांपेक्षा औपचारिक स्वरूपाची अधिक होती. सभागृहात पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर 24 मार्चला अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी त्यांनी निरोप समारंभाच्या निमित्ताने आपले दुसरे भाषण केले.
विधिमंडळातील 24 मार्चच्या शेवटच्या भाषणात त्यांनी अत्यंत मार्मिक फटकेबाजी केली. "मी राजकारणी नसून मुळात एक कलाकार आहे," असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra fadnavis) "तुम्ही मला इतके चांगले ओळखत होता, तर मग दुसऱ्याचा हात का पकडला?" असा थेट सवाल केला. तर 'अशोक खरात' प्रकरण आणि 'गद्दारी' या मुद्द्यांवरून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली. "आजकाल वाघांची शिकार स्वार्थासाठी केली जातेय," असे म्हणत त्यांनी शिंदे गटाला या भाषणातून डिवचले.
एप्रिल महिन्यात उद्धव ठाकरे यांच्यासह नऊ सदस्य निवृत्त होणार आहेत. त्यामुळे या नऊ जागेसाठी लवकरच निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुका काही महिन्यात लागणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीवरून उद्धव ठाकरेंच्या मनात नक्की काय? चालले हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.