15 Aug Independence Day meat ban : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने 15 ऑगस्ट रोजी महापालिका क्षेत्रात चिकन-मटणची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. मात्र, या निर्णयामुळे आता राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.
सत्ताधारी पक्षाचे को स्वातंत्र्यदिनीच लोकांच्या स्वातंत्र्यावर घाला घालत असल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनेसह काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला आहे. पालिकेच्या या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य चिकन-मटण असोसिएशनने देखील विरोध केला आहे.
शिवाय स्वातंत्र्यदिनी चिकन-मटण विक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर 15 ऑगस्टला केडीएमसीच्या गेटवरच कोंबड्या-बकऱ्या कापण्याचा इशारा या असोसिएशनने दिला आहे. कल्याण डोंबिवली महापालेकेच्या निर्णयामुळे एकीकडे राजकारण पेटलं असतानाच आता कल्याण-डोंबिवलीपाठोपाठ नाशिक, मालेगाव, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी या महापालिकांनीही चिकन-मटण विक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
तर छत्रपती संभाजीनगर महापालिकेने 15 आणि 20 ऑगस्ट रोजी कत्तलखानेही बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता स्वातंत्र्यदिनी 'चिकन-मटण' विक्री बंद ठेवण्याचं लोण राज्यभर पसरल्याचं पाहायला मिळत आहे.
मात्र, या निर्णयाविरोधात एकीकडे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी 15 ऑगस्टला मांसविक्री बंदीचा निर्णय काँग्रेसचाच असल्याचे पुरावे दिले आहेत. शिवाय नियमानुसार प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, राम नवमी आणि महावीर जयंती अशा राष्ट्रीय आणि धार्मिक महत्त्वाच्या दिवशी महापालिकांना कत्तलखाने बंद ठेवण्याचा अधिकार आहे.
याबाबत थेट आमसभेत नगरसेवक ठराव करून. म्हणजेच हा निर्णय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या एकमताने घेतला जातो, असंही भाजपकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय मविआ सरकारच्या काळातही हाच निर्णय तसाच कायम ठेवण्यात आल्याचंही आता भाजपकडून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांना निलंबित केले पाहिजे, अशी मागणी केली. ते म्हणाले "स्वातंत्र्यदिनी आपण काय खायचे, हा आपला अधिकार आहे, आपले स्वातंत्र्य आहे. ते आपल्याला शाकाहारी खायचे की मांसाहारी हे सांगू शकत नाहीत. शिवाय हा धर्माचा विषय नाही आणि हा राष्ट्रीय हिताचाही विषय नाही."
तर कल्याण डोंबिवली शहरात रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या आहे. स्टेशन परिसरातील वाहतूक कोंडी, पाणी समस्या अशी अनेक कामे कल्याण डोंबिवली महापालिकेला करण्यासारखे आहेत. मात्र ती कामे न करता स्वातंत्र्यदिनाला मांसविक्री बंद ठेवून ते आमच्या पोटावर पाय देत आहेत.
त्यामुळे महापालिकेने हा निर्णय तत्काळ मागे घ्यावा अन्यथा 15 ऑगस्टला महापालिकेच्या गेटवरच मटण विक्री करण्याचा इशारा खाटीक समाजाने दिला आहे. त्यामुले आता महापालिका प्रशासन मांसविक्रीचा निर्णय मागे घेणार की तो आहे असाच ठेवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.