

Pune News, March 13, 2026: यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून माध्यमिक शिक्षण विभागानं अकरावी आणि बारावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाविद्यालयांमधील क्षमतेपेक्षा जास्त प्रवेशांना लगाम बसणार आहे.
'चांगले टक्के मिळवून देऊ' अशी जाहीरात करुन डमी प्रवेश आणि कोचिंग क्लाससाठी होणारी विद्यार्थ्यांची पळवा-पळवी रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. खासगी संस्थांना आता क्षमतेइतकेच प्रवेश द्यावे लागणार आहेत.
सध्या सुरु असलेल्या (२०२५-२६) या शैक्षणिक वर्षासाठी पहिल्यांदाच अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली. यामुळे राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये १४ लाख ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आता आगामी शैक्षणिक वर्षांसाठी (२०२६-२७) अकरावीबरोबरच बारावीच्या विद्यार्थ्यांचेही प्रवेश ऑनलाइन होणार आहेत. त्यामुळे खासगी क्लास जे विद्यार्थ्यांची पळवापळवी करतात, त्याला आळा बसणार आहे.
बहुसंख्य खासगी सेल्फ फायनान्स (स्वयंअर्थसहाय्यित) व खासगी अनुदानित संस्थांकडून दरवर्षी अकरावी व बारावीच्या वर्गात क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिले जात होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पैसे देऊन त्यांच्या सोयीने कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेत होते. हा प्रवेश मिळाल्यानंतर त्यांना कॉलेजला उपस्थित राहण्याचे बंधन नव्हते, ते विद्यार्थी महाविद्यालयात जाण्याऐवजी खासगी कोचिंग क्लाससाठी दुसऱ्या जिल्ह्यात वर्षभर मुक्कामी जात होते. हा प्रकार आता ऑनलाइन प्रवेशामुळे कायमचा बंद होणार आहे.
सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर फक्त प्रात्यक्षिक परिक्षेसाठी विद्यार्थी कॉलेजमध्ये येत होते. पण आता अंशतः अनुदानित खासगी शाळांमधील अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदविणे बंधनकारक आहे. बायोमेट्रिक हजेरीवर विद्यार्थ्यांची पटसंख्या गृहीत धरली जाणार आहे. त्यावर आधारितच अनुदानाचा वाढीव टप्पा सरकाकडून संबधित शाळांना मिळणार आहे.
अनेक शिक्षण संस्था बोर्डाने ठरवून दिलेल्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात प्रवेश देतात. बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरल्यानंतर त्याची माहिती शालेय शिक्षण विभागाला समजते. त्यावेळी त्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, या सकारात्मक भूमिकेतून त्या वाढीव प्रवेशाला बोर्डाला मान्यता द्यावी लागते. हा प्रकार आता ऑनलाइन प्रवेशामुळे कायमचा बंद होणार आहे.
राज्यात खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, खासगी स्वयंअर्थसहाय्यित अशी नऊ हजार २०० कनिष्ठ महाविद्यालये आहेत. सध्या सुरु असलेल्या शैक्षणिक वर्षांसाठी या महाविद्यालयांमध्ये गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश घ्यावा लागला. त्यासाठी पाच प्रवेश फेऱ्या राबविण्यात आल्या.
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात आता अकरावीसोबतच बारावीच्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइनच प्रवेश घ्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना आधी नोंदणी करून कनिष्ठ महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे. बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.