BJP-SHIVSENA NEWs : शिवसेनेचे माजी मंत्री तथा सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे विद्यमान आमदार अब्दुल सत्तार कायम चर्चेत असलेले नाव. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते 2800 मतांनी विजयी झाले. परंतु त्यांच्या या विजयावरही विरोधकांकडून शंका घेतली जात आहे. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांच्यावर भाजपची वक्रदृष्टी असल्यानेच त्यांची संधी हुकल्याची चर्चा असतानाच आता भाजपचे 'ईडी फेम' नेते किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवल्याचे दिसते.
बांगलादेशी रोहिंग्यांच्या मुद्दा हाती घेत भाजपचे किरीट सोमय्या (kirit somaiya) सध्या राज्यातील विविध शहरांमध्ये फिरत आहेत. बेकायदेशीररित्या वास्तव्यास असणाऱ्या आणि जन्म प्रमाणपत्राच्या दाखल्यासाठी अर्ज केलेल्यांची माहिती घेऊन सोमय्या यांनी नुकतीच मालेगावला भेट दिली होती. त्यानंतर काल अचानक सोमय्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आले आणि जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून गेले. या भेटीत त्यांनी संभाजीनगर जिल्ह्यात 10 हजारांवर बांगलादेशी नागरिक असून, यातील सर्वाधिक निम्मे पाच हजार एकट्या सिल्लोड तालुक्यात असल्याचा दावा सोमय्या यांनी केला.
विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीआधीच सिल्लोड-सोयगाव मतदारंसघातील भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत मतदारसंघात 25 हजार बोगस मतदार असल्याचा दावा करत चौकशीची मागणी केली होती. महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांनी महायुतीचे उमेदवार (Abdul Sattar) अब्दुल सत्तार यांनी आपल्या संस्थेच्या शाळेतील अल्पवयीन मुलांची आधार कार्ड काढत त्यांची बोगस नावे मतदार यादीत धुसवल्याचा गंभीर आरोपही केला होता.
अर्थात त्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही, आणि विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार चौथ्यांदा विजयी झाले. काठावर झालेल्या या विजयाने सत्तार समाधानी नाहीत, जातीयवादाला महत्व दिले गेले,विकास कामे करून मला कमी मते मिळाली, त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक आपण लढणार नाही, असेही सत्तार यांनी नुकतेच जाहीर केले होते. त्यानंतर किरीट सोमय्या यांचा जिल्हा दौरा, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार आणि त्यात सिल्लोडचा उल्लेख यावरून भाजपच्या निशाण्यावर अब्दुल सत्तार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्याच उमेदवाराच्या विरोधात जालना मतदारसंघात काम केल्याचा ठपका सत्तार यांच्यावर आहे. तेव्हापासून सत्तार भाजपच्या हिटलिस्टवर असल्याची चर्चा आहे. किरीट सोमय्या यांनी आपला मोर्चा त्यांच्याकडे वळवल्याने भविष्यात अब्दुल सत्तार अडचणीत येऊ शकतात? असे दिसते. सत्तार यांचा सिल्लोडवरील एकछत्री अंमल संपवण्यासाठी भाजप मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. सोमय्या यांनी सिल्लोडबाबत आरोप करून रणशिंग फुंकले आहे. सध्या त्यांनी थेट सत्तार यांचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या निशाण्यावर सत्तारच असल्याचे स्पष्ट आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर सोमय्या यांनी काही गोष्टींचा खुलासा केला. त्यात प्रामुख्याने 2024 मध्ये जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले. लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल दोन लाखांहून अधिक बांगलादेशी राज्यात दाखल झाले. आपण राज्यातील 17 जिल्ह्यांचा दौरा केला असता यातील ९० टक्के अर्ज आणि त्यातील कागदपत्रे बोगस असल्याचे समजले असून हे बोगस अर्ज मंजूर करण्यासाठी राजकीय दबाव वापरला जात असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्र मिळावे यासाठी एकूण 10 हजार 68 अर्ज आले आहेत. यात एकट्या सिल्लोडमधून 50 टक्के म्हणजे तब्बल 4 हजार 730, तर शहरातून 2 हजार 448 अर्ज आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून लक्ष घालण्यास सांगितले असून, प्रत्येक अर्जाची सखोल पडताळणी केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सोमय्या म्हणाले. दरम्यान, संबंधिताने दाखल केलेल्या प्रत्येक कागदपत्रांची त्या विभागाकडून पडताळणी केली जाईल.पासपोर्ट प्रमाणे कागदपत्रांची कडक पडताळणी केली जावी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.