Latur News : काँग्रेस आमदार अमित देशमुख यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी लातूरसह मराठवाड्यातील बीड-धाराशीव जिल्ह्यांमध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि क्लस्टर विकसित करण्याची मागणी देशमुख यांनी त्यांच्याकडे केली. महाराष्ट्र सरकारकडे ही मागणी अगोदरच नोंदवण्यात आलेली आहे असे सांगून केंद्राने यात लक्ष घालावे, अशी विनंतीही गडकरींना करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Amit Deshmukh) अमित देशमुख हे लातूर शहर मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत. यावेळी त्यांचे मताधिक्य घटले असले तरी राज्यात महायुतीला मिळालेला बुस्ट पाहता अमित देशमुख यांनी आपला मतदारसंघ राखल्याने त्यांचे महत्व वाढले आहे. या शिवाय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीत देखील देशमुख यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जाते. लातूरमध्ये मताधिक्य घटल्यानंतर अमित देशमुख पुन्हा एकदा मतदारसंघ आणि जिल्ह्याचे प्रश्न घेऊन कामाला लागल्याचे चित्र आहे.
नुकतीच त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची दिल्लीत भेट घेतली आणि राष्ट्रीय महामार्ग, सहकार, औद्योगिक अशा सगळ्याच विषयावर लातूर जिल्हा आणि मराठवाड्यातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यात प्रामुख्याने लातूर व मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या लातूर- टेभुर्णी महामार्गावरील मुरूड अकोला ते येडशी या टप्प्याच्या कामासाठी मंजूरी देऊन निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.त्याचबरोबर येडशी ते टेभुर्णी दरम्यानच्या कामालाही मंजुरी देऊन संपूर्ण महामार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्याची विनंती केली.
लातूर ते जहीराबाद या राष्ट्रीय महामार्गाला ठिकठिकाणी तडे गेले आहेत, साईड पट्ट्या खचल्या आहेत, नाल्याचे काम व्यवस्थित झाले नाही. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून ते काम दुरुस्त करून घ्यावे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 ची सुपर लिंक म्हणून शिरूर ताजबंद ते उदगीर या रस्त्याचे बांधकाम करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे देशमुख यांनी केली. महाराष्ट्रातील आणि देशातील साखर उद्योगासंदर्भानेही यावेळी चर्चा झाली. साखरेच्या हमीदराकडे अमित देशमुख यांनी गडकरींचे लक्ष वेधले. यावर केंद्र सरकारच्या स्तरावर या संदर्भाने चर्चा सुरू आहेत, त्याला गती देण्याची ग्वाही गडकरी यांनी यावेळी दिली.
साखर आणि इथेनॉल चे हमीदर वाढले तर एकंदरीतच साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळेल आणि देशांमध्ये आणि राज्यातील साखर कारखान्याकडे असलेली थकबाकी कमी होईल. शिवाय शेतकऱ्यांना वाढीव एफआरपी देता येईल, हा मुद्दाही अमित देशमुख यांनी गडकरींच्या भेटीत मांडला. मराठवाड्यातील लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यामध्ये ऑटोमोबाईल इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री क्लस्टर विकसित करण्याची विनंती देशमुख यांनी गडकरी यांच्याकडे केली. महाराष्ट्र सरकारकडे ही मागणी अगोदरच नोंदवण्यात आलेली आहे, केंद्राने यात लक्ष घालावे, अशी विनंती त्यांनी केली.
सर्वच ठिकाणी आता ई मोबिलिटी मोठ्या प्रमाणामध्ये नावारूपाला येते आहे. त्यामुळे लातूर, बीड, धाराशिव या जिल्ह्यात ई मोबिलिटी सेक्टर झोन विकसित झाले तर खऱ्या अर्थाने या भागात दरडोई उत्पन्न वाढण्यास मदत होईल. सुशिक्षित बेकारांच्या हाताला काम मिळेल, उपजीविकेसाठी होणारे स्थलांतर रोखण्यामध्येही यामुळे काही प्रमाणामध्ये आपल्याला यश मिळेल. केंद्र आणि राज्य सरकार या संदर्भामध्ये ठोस पावलं उचलेल आणि या दुष्काळी भागाला न्याय देण्यासंदर्भामध्ये भूमिका बजावेल, अशी अपेक्षा या भेटीत अमित देशमुख यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.