
लक्ष्मीकांत मुळे
Nanded News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यापाठोपाठ मेहुणे माजी मंत्री भास्कर पाटील खतगावकर यांनीही कमळ हाती घेतले. सुनबाई मिनल खतगावकर यांना लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले,पण त्यात यश आले नाही. लोकसभेला अशोक चव्हाण, महायुतीतील घटक पक्षांची ताकद सोबतीला असूनही नांदेडमध्ये भाजप महायुतीचा दारुण पराभव झाला.
काँग्रेसच्या दिवंगत वसंतराव चव्हाण यांनी नांदेड (Nanded) लोकसभेची जागा राखली. महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीतील हे डोळे दिपवणारे यश पाहून विधानसभेची संधी हेरण्यासाठी खतगावकर यांनी पुन्हा काँग्रेसला साद घातली आणि पक्षात प्रवेश करत सुनबाईची उमेदवारी फिक्स केली. काँग्रेसला अशोक चव्हाण यांच्याशिवाय अच्छे दिन येणार,असा भास्कर पाटील खतगांवकर यांचा अंदाज होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांनी सोबत राहण्याचे आवाहन केले असताना खतगावकर यांनी ते झुगारले आणि काँग्रेसचा हात घट्ट धरला.
पण विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि खतगावकरांचा सगळा गेमच फसला. महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या जोरावर नांदेड जिल्ह्यातील सर्व जागा जिंकल्या आणि महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला. नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत कशीबशी (Congress) काँग्रेसची लाज राखली गेली. त्यानंतर आता भास्कर पाटील खतगावकर यांनी पुन्हा पक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये असल्यामुळे खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी नुकतीच अजित पवारांची भेट घेतल्याने लवकरच ते काँग्रेसची साथ सोडणार, असे दिसते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्याने भाजप, शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सध्या जोमाने कामाला लागले आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सुरक्षित मार्ग शोधतांना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी भाजप आणि अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाची वाट धरली आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे काही माजी आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.
त्यातच माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने या चर्चांना उधाण आले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात भास्करराव पाटील खतगावकर यांचे वर्चस्व राहिले आहे. ते आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राहिले आहेत. मेहुणे अशोक चव्हाण यांच्याशी असलेल्या मतभेदातून खतगावकरांनी 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.याचा फटका अशोक चव्हाणांना बसला होता. त्यानंतर खतगावकरांनी घरवापसी करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
अशोक चव्हाण यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकी आधी भाजपमध्ये प्रवेश केला. सुनबाई डॉ. मिनल पाटील खतगावकर यांच्यासाठी उमेदवारी मागितली,पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधानसभेच्या नायगाव मतदारसंघातून मिनल खतगावकर यांच्यासाठी उमेदवारी मिळवली. पण विजय मात्र त्यांना मिळवता आला नाही. या मतदारसंघातुन भाजपचे आमदार राजेश पवार दुसऱ्यांदा निवडून आले.
भास्करराव पाटील खतगावकर हे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात.पण गेल्या दहा वर्षांत त्यांना मोठे यश मिळाले नाही. देगलूर- बिलोली, नायगाव, धर्माबाद, मुखेडसह जिल्ह्यातील ग्रामीण भागात त्यांचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ते कोणता निर्णय घेणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.