Latur News : लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोमवारी (ता.11)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मुंडेंसोबतच्या राजकीय आठवणींना उजाळा दिला. याचवेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंबाबत मोठा गौप्यस्फोट केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) या कार्यक्रमात म्हणाले, गोपीनाथ मुंडे यांना ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांना अधिक काळ मिळाला असता तर या देशाचे नेते म्हणून आपण त्यांना पाहू शकलो असतो. पण त्यावेळी तेव्हा आम्ही मोदीजींना सांगितलं होतं, उधारीवर गोपीनाथराव यांना तुम्हाला दिले आहे, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करणार होतो, पण ते स्वप्नं आम्हाला पूर्ण करता आले नसल्याची खंतही फडणवीसांनी या कार्यक्रमात बोलून दाखवली.
गोपीनाथ मुंडे यांची नेतृत्व, वक्तृत्व, कर्तृत्व आणि हिंमत असलेला नेता अशी ओळख होती. आज एकीकडे त्यांचा तर दुसरीकडे विलासराव देशमुख यांचा पुतळा आहे. विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि लोकनेते म्हणून मोठी लोकप्रियता मिळवली. या स्मारकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा दोन्ही मित्र एकत्र आल्याचंही सांगितलं. या दोघांची मैत्री महाराष्ट्राला परिचित असल्याचंही म्हटलं.
संघर्षातून वाटचाल करत पस्तिसाव्या वर्षी गोपीनाथराव भाजपाचे अध्यक्ष झाले. संघर्ष करणारा तरूण म्हणून त्यांना संधी देण्यात आली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. राज्यात पक्षाचे संघटन उभे करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) होते. वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून त्यांनी संघर्ष केल्याचंही या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेता कसा असावा? याचे उदाहरण देताना मुंडे यांचं नाव समोर आल्याशिवाय राहत नाही. मुघलांना जसे संताजी-धनाजी पाण्यात दिसायचे. तसे नव्वदच्या दशकात तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना स्वप्नातही गोपीनाथ मुंडे दिसल्याचा मिश्किल टिप्पणीही फडणवीसांनी केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी आजच्या विरोधकांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, आज विरोधक आरोप करताना हवेत बार सोडतात. पण गोपीनाथ मुंडे यांनी तसे कधी केले नाही. 1990 मध्ये जेव्हा मुंडेसाहेब विरोधी पक्षनेते होते, जेव्हा ते सभागृहात आरोप करायचे तेव्हा समोरच्याचा राजीनामा घेऊनच खाली बसायचे, असे त्यांचं काम असल्याचा दाखलाही दिला.
महाराष्ट्रात दाऊदचा बोलबाला होता, तेव्हा सभागृहात उभं राहून त्याला आव्हान देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. त्याकाळात त्यांनी अनेक घोटाळे बाहेर काढले. 1995 ला संघर्ष यात्रा काढली आणि उभा महाराष्ट्र त्यांनी ढवळून काढला. यात्रेला एवढा प्रतिसाद मिळायचा की अख्खे गाव रिकामं व्हायचं अशी आठवणही फडणवीसांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.