Latur Politics News : माझ्या बाबतीत टीका केली गेली, की माझी कार्यपद्धती मुंडेसाहेबासारखी नाही, पण त्यांना जशी अपेक्षित आहे, तशी नक्कीच आहे. मुंडेसाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात संघर्ष केला, तो संघर्षाचा वारसा माझ्या वाट्यालाही आला. त्यासोबतच कारस्थानही आले, माझ्या वडीलांनी त्यांचा वारस मला आधीच घोषित केलं होतं. पण स्वाभीमान कधी गहाण ठेवायचा नाही, फेकलेले तुकडे घ्यायचे नाही, ही त्यांनी दिलेली शिकवण मी जपत आहे. कोणाबद्दल द्वेष भावना ठेवू नको, नेहमी बेरजेचे राजकारण करायचे हे त्यांनी मला शिकवल्याचे सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी दाटलेल्या कंठातून गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भाषण करताना पंकजा मुंडे भावूक झाल्या. वडीलांच्या आठवणींनी त्यांच्या अश्रूचा बांध फुटला. माझ्या वडीलांनी त्यांच्या तोंडातून सांगीतलं की मी त्यांची वारस आहे. त्यामुळे त्या वारसाला सुईच्या टोका इतकाही धक्का लागू देणार नाही. मुंडे साहेबांच्या वारशासोबत संघर्ष आला, अडचणी आल्या. परंतु आम्ही संस्कारात वागलो, कुणाबद्दलही वाईट विचार केला नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
प्रांजळ, सोज्वळ राजकारणाच उदाहरण गोपीनाथ मुंडे-विलासराव देशमुख यांनी राज्यात घालून दिले. रमेशआप्पा तुम्ही रेणापूरचे आमदार झाले, तुम्ही भाग्यवान आहात. मला परळीचं आमदार व्हाव लागलं. मुंडेसाहेबांच चरित्र लिहा असा आग्रह लोक धरतात, मी ते लिहीन की नाही मला माहित नाही, पण तुमच्या डोळ्यातून मला त्यांचे चरित्र दिसतं. मी थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर झुकणार नाही. मी उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, एवढा शब्द देते असे सांगत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड-लातूरकरांचे आभार मानले.
आज माझे पिता आणि तुम्हा सर्वांचे नेते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची कर्मभूमि असलेल्या लातूरमध्ये जिल्हा परिषदेच्या परिसरात त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण झाले. कष्टाळू, कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या पुतळ्याचे अनावरण व्हावे, अशी कदाचित गोपीनाथ मुंडे यांचीच इच्छा असावी. आजचा दिवस असा आहे, काय बोलावं ते कळत नाही. मी जेव्हा हाॅस्पीटलमध्ये गेले तेव्हा दिल्लीत मुंडेसाहेबांच्या मृतदेहाजवळ देवेंद्रजी उभे होते. तोच एक चेहरा मला तिथे दिल्लीत ओळखीचा वाटला आणि मी त्यांना पाहून टाहो फोडला.
बाबा मला धन्यवाद म्हणाले..
मुंडेसाहेब या संकटातून बाहेर येतील असे वाटले होते, पण ते घडले नाही. त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप दिवस लागले. मी मुंडेसाहेबांची वारस आहे हे सांगता पंकजा मुंडे यांनी 2014 च्या निवडणुकीतील एक आठवण सांगितली. साहेब मला म्हणाले, पंकजा धन्यवाद. मला पाडण्यासाठी बारा आमदार काम करत होते, पण तू एकटी त्या बारा जणांना पुरून उरलीस, त्या त्यांच्या एका शब्दाने मला ताकद दिली. गेल्या पाच वर्षात मी कुठल्याही पदावर नव्हते. काय करायचं हे मुंडेसाहेबांनी मला शिकवलं नाही, पण काय नाही करायचं हे त्यांनी शिकवलं. मी कोणाचा एकेरी उल्लेख करत नाही, राग, द्वेष मनात ठेवत नाही.
माझ्या वडीलांना जाऊन अकरा वर्ष झाले, त्यानंतर हा पुतळा उभारला जातोय. मी मंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून इथे आहोत. यापेक्षा अधिक काय हवे आहे. स्वाभिमान आम्हाला मुंडे साहेबांनी शिकवला. हे तत्व देवेंद्र फडणवीस यांनी बाळगले आहे. भावनेवर सत्ता येत नाही, त्यासाठी बेरजेचे राजकारण करावे लागते. वारसामध्ये संघर्ष आला, पण प्रत्येकाला जवळ करायचे हे संस्कार मुंडेसाहेबांनी मला दिल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. तुला गोपीनाथ मुंडे व्हायचे आहे, पण सुधारित आवृत्ती व्हायची आहे असं मुंडे साहेबांनी मला सांगीतलं होतं. त्यामुळे कधीही स्वाभिमान गहाण न ठेवता राजकारण करण्याचं वचन मी माझ्या वडिलांना दिले होते त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.